'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday 12 April 2011

गाभा-यातले सूर

आज रामनवमी. वाडीतल्या मंदिरात वडिलांचं रामजन्माचं कीर्तन सुरू असेल. फुलांनी सजवलेल्या पाळण्यात देहुडा रामराया ठेवून पाळणा म्हटला जात असेल. मार्गशिर्षातल्या या दुपारी डवरलेले गुलमोहोर टवकारून पाळणा ऐकत असतील. देवळाच्या आवारातला चाफा पे-या पे-यांनी फुलून घमघमत असेल. देवळात आणि देवळाबाहेर असा उत्सव सुरू असेल...
आणि त्याही आधी भल्या सकाळपासून,
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा।
भक्ताचिया काजा पावतसे।।...हा अभंग ऐकत घराघरांत सुंठवड्याची तयारी झाली असेल.


लहानपणाच्या या आठवणी अशा अभंगवाणीत मिसळून डोळ्यासमोर तरळतायत. अभंगवाणी ऐकली तर या आठवणी जाग्या होतात. आणि आठवणींसोबतच मनाच्या गाभा-यात अभंगवाणी घुमू लागते. बाळपण घडवणा-या या अभंगवाणीचे उद्गाते पंडीत भीमसेन जोशी जाऊन चार महिने होत आले. आता रामनवमीच्या निमित्तानं पुन्हा ते सूर ऐकू येतायत.