'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 22 December 2011

सेन्सॉर धुडकावणा-या लेखण्या

रस्त्यावर उतरून लढणा-या देशभरातल्या स्त्रियांचं लिखाण मराठीत येतंय. मनोविकास प्रकाशनने हे शिवधनुष्य उचललंय. तब्बल ४० पुस्तकांची भारतीय लेखिका नावाची ही मालिका आहे. पैकी ११ पुस्तकं तयार झालीत. त्यांची लोकप्रभामधून करून दिलेली ही ओळख...


एखादं गाव किती शहाजोग आहे, याचा कानोसा घ्यायचा असेल तर पाणवठ्यावर गावातल्या बायका काय काय बोलतात ते ऐकावं असं म्हणतात. मोठ्या समाजाबद्दलही तसंच म्हणता येईल. कुठलाही समाज किती निकोप आहे किंवा प्रगतीची किती शेखी मिरवतो, हे समजून घ्यायचं असेल तर त्या समाजातील स्त्रियांचं लिखाण वाचावं. अगदी लख्ख प्रतिबिंब उभं राहील. हे लिखाण म्हणजे समाजाचा आरसाच. पण बाई बोलते म्हटल्यावर लगेचच कान टवकारतात. आपल्याविषयीच काही तरी बडबडतेय असं लक्षात आलं तर अगोदर तिचं तोंड बंद केलं जातं. गपगुमान राहण्याची तंबी दिली जाते. खेडेगावातल्या एखाद्या छोट्या कुटुंबापासून तर जगभरातल्या प्रगत, अप्रगत समाजात हेच चित्र दिसतं. 

Saturday 3 December 2011

सोयराबाईचा विटाळ सुटो...

नवशक्तिने आज महापरिनिर्वाणदिन विशेष पुरवणी काढलीय. भीमराव की बेटी हूँ मै!’ अशी थीम आहे. त्यात माझाही संत सोयराबाई आणि कुटुंबावरचा लेख छापलाय...
भल्या पहाटे सावळ्या विठूरायावर दूध, दही, मधादी पंचामृताचा अभिषेक सुरू आहे. टिपेचा सूर लावून बेणारे पुरुषसूक्त म्हणतायत. त्याची गंभीर लय गाभा-यात आवर्तनं घेतेय. परिचारकांनी गरम पाण्यानं भरलेली चांदीची घागर नुकतीच आणून ठेवलीय. आता ते धुपाटण्यात धूप नीट जुळवून ठेवतायत. बडवे देवाच्या भरजरी वस्त्रांच्या घड्या उलगडतायत.

Thursday 1 December 2011

अत्रे आणि शिवसेना

आठवड्याभरापूर्वी पेपरात एक बातमी वाचली. शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे! मला पीएच.डी.चे दिवस आठवले. पत्रकार अत्रेअसा संशोधनाचा विषय होता. सुरुवातीलाच मी वरील बातमीच्या निष्कर्षावर आलो. पण पुढं वाचत गेलो, तसं लक्षात आलं की, अरे ही तर महाराष्ट्राची परंपरा आहे. कॉपीची म्हणा हवी तर. (साप्ताहिक लोकप्रभाततशा आशयाचा मी एक लेखही लिहिला होता) महाराष्ट्रप्रेमाच्या भुतानं ज्याला झपाटलं तो अशाच प्रकारच्या गर्जना करणार न् लिहणार. मग ते लोकमान्य टिळक असोत, शि. म. परांजपे असोत, अच्युतराव कोल्हटकर असोत, प्रबोधनकार ठाकरे असोत, राम गणेश गडकरी असोत की आचार्य अत्रे..!
परवा भल्या सकाळीच पोराला घेऊन शिवाजी पार्कावरच्या श्रॉफ हाऊसमध्ये गेलो होतो. तिथं अत्रेकन्या शिरिष पै राहतात. आचार्य अत्रे इथंच राहायचे. हॉलमधला अत्र्यांचा अर्धपुतळा पाहून मनात पुन्हा आलं, कदाचित हे शिवसेनाप्रमुखांचं, अत्र्यांचं घर असतं...पण इतिहासात जर, तर, कदाचित नसतात...


शिवसेनेच्या संकल्पनेचे खरे जनक आचार्य अत्रे!, अशी बातमी नुकतीच
वर्तमानपत्रात वाचली. आता सुमारे अर्धशतकानंतरहरपले श्रेय शोधण्याची धडपड काअसा विचार यानिमित्तानं मनात आल्याशिवाय राहिला नाही. खरं तर प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे ही मराठी माणसाची दोन दैवतं. महाराष्ट्राकडं हे दोन महारथी नसते तर, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढा जिंकणं अशक्य होतं, हे प्रत्येक मराठी माणूस जाणतो. हा लढा लढवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं जे पंचायतन होतं, त्यात अग्रभागी होते, ठाकरे आणि अत्रे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या लेखण्या आणि वाण्या वीजेप्रमाणं कडाडल्या. जनमानसाला त्यांनी खडबडून जाग आणली. म्हणून तर मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. 

Saturday 12 November 2011

तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा

आमचे परममित्र श्री. सचिन शंकर परब थोर परंपरा असलेल्या दैनिक 'नवशक्ति'चे संपादक झाले. पहिल्याच आठवड्यात त्यांना तुकोबारायांची आठवण झाली. निमित्त, संत तुकाराम सिनेमाला पाऊणशे वर्षे पूर्ण झाल्याचं. त्यांनी मला विषय सांगितला. लिहायला बसलो न् भलतीच तंद्री लागली. त्यांनी तो लेख आजच्या रविवार पुरवणीत छापलाय...


परवा टळटळीत दुपारी देहूत पोहोचलो. नको गर्दीची भानगड म्हणून. तशी एरवीही देऊळवाड्यात फारशी गर्दी नसतेच. पण शांत, निवांतपणासाठी दुपारसारखी वेळ नाही. 
अचानक एकामागून एक माणसं येऊ लागली. दिसेल त्याच्या पाया पडू लागली. माणसांच्या, दगडी भिंतींच्या, त्यावरील चित्रांच्या, खांबांच्या. एकमेकांच्या. लगबग करून रांगेत उभी राहू लागली. माना उंचावून अधिरतेनं पुढं सरकू लागली. मी अल्लद बाजूला झालो. पाहू लागलो. दोन तीन लक्झ-या आल्या होत्या भरून. खान्देशातून. मी पिंपळाची सावली पकडली. समोर वीणेकरी दिसत होता. दर्शन करून, मंदिर फिरून आलेली माणसं त्याच्या पायावर डोकं टेकवत होती. पुन्हा उठून झरझर पाय-या उतरून खाली येत होती. वीणेची संथ लय आणि दगडी गारवा मनात मुरू लागला. डोळ्यांच्या कॅमे-यानं फ्रेम पकडली. टाईट. क्लोज. वीणेक-याचे पाय. त्यावर क्षणभर टेकणारी डोकी. आणि पाय-या उतरणारी, उन्हापावसात राबून निब्बर झालेली, शेतक-यांची पावलं.

कुठल्या काळात, कुठल्या जगात वावरतायत ही माणसं? क्षणभर मनात कीव दाटून आली. देवळात येऊनही कुठला नवस बोलत नाहीत. गा-हाणं घालत नाहीत. सोनं नाणं दान करत नाहीत. नुसतीच तुळशीची दोन पानं वाहून डोकं टेकायचं. यांचा देवही माणसाच्या रुपातला. धोतर, बाराबंदी, डोईला फेटा. मांडी घालून बसलेला. तुकारामबाबा! डोळ्यापुढं उभा राहिला. फत्तेलाल, दामलेंचा संत तुकाराम सिनेमातला. लहानपणापासून पाहिलेला. केवढं पुण्य लागलं असेल प्रभातला. इथल्या, देशातल्या, परदेशातल्या लोकांसमोर त्यांनी तुकोबाराया सदेह साकार केला. विष्णुपंत पागनिसांच्या रुपातल्या याच तुकोबाचं चित्र आम्ही शाळेतल्या पुस्तकात पाहिलं. आळंदी पंढरीहून आणलेल्या, भिंतीवर लावलेल्या फोटोंमध्ये पाहिलं. 
या फोटोपुढं उदबत्या लावून, टाळ्या वाजवत आरती तुकारामाम्हटली. अजूनही म्हणत आहोत. पाऊणशे वर्षं झाली. या तुकाराम दर्शनाबद्दलप्रभातच्या पायावर पहिल्यांदा डोकं टेकवावं. मग पाय-या उतराव्यात. आणि पिंपळाची सावली पकडावी. 
डोळ्यांचा कॅमेरा फोकस करावा. एकामागून एक उतरणारी, शेतात राबून निब्बर झालेली पावलं टिपत राहावीत. डोळ्यापुढं तुकारामबाबा उभे राहतात. पण भलत्याच रुपात. फत्तेलाल दामलेंचे पांढ-या स्वच्छ कपड्यातले, चेह-यावर सारे सात्विक भाव दाटलेले, मऊ, मृदू आवाजात बोलणारे, भोळेभाबडे तुकोबाराय. त्याच्या जागी मिशांना पिळ भरलेले, धुवट बाराबंदीच्या बाहया सरसावलेले, हातात सोटा घेतलेले देहूचे तुकोबा उभे राहतात.
काय रे? रांडेच्या xxx मी... नेभळट दिसतो काय तुला’? असं दरडावतात. आता पुढचा प्रसंग टळावा म्हणून मी घाईगडबडीनं कॅमेरा बंद करतो. आणि देवळातून सटकतो.  घाईघाईनं कॅमे-याची लेन्स बदलतो.

वाईड अँगल लेन्समधून देहू आणि परिसर न्याहाळू लागतो. तोच बारा मावळ, तोच भंडारा, तोच भामचंद्र, तीच इंद्रायणी, काठावरचं तेच नांदुरकीचं झाड, आणि तोच डोह. ज्यात तुकारामाच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या. आता मला पु. ल. देशपांडे आठवतात. त्यांच्या तुका म्हणे नाटकातली पात्रं जिवंत होतात. देहूजवळच्या सुदुंब-यातले तेली समाजाचे संताजी जगनाडेबुवा. तुकोबांचे लेखक. मंबाजीबुवाला ऐकवतायत, ‘‘केवढ्या भ्रमात आहात तुम्ही मंबाजीबाबा! या वह्या बुडवून अभंग बुडणार? त्याचं नावच अ-भंग आहे. त्यांना भंग नाही. मी लिहिलेलं महाराजांचं कवित्व तुम्हाला बुडवता आलं. पण या गेन्या चांभाराच्या तोंडातले अभंग कुठे नेऊन बुडविणार? आज या देहू गावात रोज सकाळी जात्यावर हेच अभंग गायले जातात. मोटेवरचा बैल या अभंगाच्या नादानं शेतं पाजतो. आई लेकराला पोटाशी घेऊन झोपताना या अभंगांची अंगाई गाते. लोहाराच्या मेटावर विठ्ठल नामाच्या गजरात लोखंडाचे घण बसतात. सोनाराचे नाजूक हात या अभंगाच्या तालावर दागिने घडवतात. लोहगावचा रावा महार रस्ते झाडताना हे अभंग गातो. बारा मावळच्या मनात जाऊन बसलेले हे अभंग कसे बुडवणार तुम्ही?’

दुस-या दृश्यात जगनाडेबुवा, अभंग बुडवण्याची आज्ञा देऊन पश्चाताप पावलेले रामेश्वर भटजी आणि त्यांची पत्नी जानकी मावळ खो-यात खेडोपाड्यात, बांधाबांधावर फिरताना दिसतायत. ते काही तरी मागतायत. गोळा करतायत. कागदावर टिपून ठेवतायत. त्याविषयी जगनाडेबुवा सांगतायत, ‘‘वह्या विसर्जित केल्या आणि मी, आई आणि रामेश्वरबाबा निघालो. आईनं गावोगावच्या जात्यावरनं आणि पाळण्याकडनं तुमचे अभंग वेचले. मी शेतमळ्यांतून फिरलो आणि रामेश्वरबाबा गृहस्थांच्या घरात हिंडले. गावागावांतून सा-या मावळ प्रांतात पाखरांसारखं भिरभिर फिरलो आणि हे तुळशीचं बी गोळा करून आणलं.’’
पण या अभंगांमध्ये असं आहे तरी काय? असं विचारायला मी तोंड उघडणार तोच पु. लं.च्या बाजूने प्रचंड देहाचे सुटाबुटातले आचार्य अत्रे येतात. आमची दखलही न घेता इंद्रायणीकडं पाहत आपल्या पहाडी आवाजात अभंग म्हणू लागतात. त्याला  जोडून निरुपणही.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
जगातील सर्व गरीबांना आणि दलितांना नवनीतासारख्या कोमल अंत:करणाने आणि समबुद्धीने जो आपल्या हृदयाशी धरतो, तोच खरा ईश्वराचा अवतार. हे पृथ्वीमोलाचे महान सत्य संसार सागराच्या तळाशी बुडी मारून तुकारामाने बाहेर काढले. जगामधल्या कोणत्या धर्मसंस्थापकाने, तत्वज्ञाने आणि पंडिताने याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचे तत्त्व आजपर्यंत सांगितले आहे?
अहो, आम्हा महाराष्ट्रातल्या माणसांचे केवढे हे भाग्य की, तीनशे वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठी शूद्र कुळात जन्माला आलेला एक सत्पुरुष गेली तीनशे वर्षे सतत आपल्या हातांनी आमच्या डोळ्यांमधले अश्रू पुसत आहे आणि आपल्या अभंगवाणीने आम्हाला आशा देऊन, धीर देऊन, जागृती देऊन, आमचा उद्धार करीत आहे! या महाराष्ट्रातले लक्षावधी भोळेभाबडे, अडाणी आणि गरीब प्रापंचिक लोक गेली तीनशे वर्षे तुकारामाची भाषा बोलत आहेत आणि तुकारामाचे तत्त्वज्ञान सांगत आहेत. एवढ्या साध्या, सुबोध आणि रसाळ भाषेत संसाराचे सार इतके सोपे करून या जगात कुठे कोणी तरी सांगितले असेल काय हो?’’

निरुपण संपवताना अत्रे अचानक आमच्याकडं मोहरा वळवतात. म्हणतात, काय हो, तुम्हाला मी केलेली मराठी माणसाची व्याख्या ठाऊक आहे काय? ‘‘तुकोबाचा निदान एक अभंग ज्याला पाठ येतो, तो मराठी माणूस. ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, त्याच्या शिरी लाथा हाणा चार’’ चला म्हणून दाखवा एक तरी अभंग. आमची उडालेली गाळण पाहत म्हणतात, बरं हे सांगा, तुकाराम सिनेमातल्या शेळपट तुकारामापेक्षा त्याची बाईल आवडी उजवी न् खणखणीत का वठलीय?’ आमच्याकडून उत्तराची अपेक्षा न करता तेच म्हणतात, अहो जिजाईचा अभिनय करणारी ती गौरी नावाची नटी अक्षरओळख नसलेली अडाणी बाई होती!’ आणि अत्रे आपल्याच हास्याच्या गडगडाटात हरवून जातात.
मी हळूच भंडा-याच्या वाटेला लागतो. तुकाराम मनात घुमू लागतो. व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात तुकाराम सिनेमानं बाजी मारली. गो-या लोकांनी तोंडाचा आ करून या कुणबटाचे विचार ऐकले. त्यानंतरही तुकारामांवरचे सिनेमे आले आणि गेले. पाऊणशे वर्षे झाली. पण मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, किंवा भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथाअसं ठणकावणारे तुकोबा कुठल्याच सिनेमात दिसले नाहीत.

माझ्या तर मनात अनेक पटकथांच्या लडी उलगडतायत. तुकोबांच्या जीवनातल्या ओपनिंग शॉटसची तर गर्दी झालीय. कोणता घ्यावा न् कोणता नको. तुकाराम, तुकाराम नाम घेता कापे यम असं म्हणत, शेताच्या बांधावर बाजरीची भाकरी आणि खर्डा हातावर घेऊन खाणारा शेतकरी. तुकारामांचा आवडीचा अभंग म्हणून दाखवणारा त्यांचा लाडका टाळकरी. तुकयाचे अभंग लिहिणारा कडूस गावचा गंगाधरबुवा मवाळ किंवा संताजी जगनाडे. सावकारीची गहाणखतं इंद्रायणीत सोडताना साक्षीदार असलेला तुकयाबंधू कान्होबा, भामनाथाच्या डोंगरावर चार दिवस उपाशी बसलेल्या तुकोबांना भाकरी घेऊन जाणारी कजाग जिजाई, तुकोबांच्या पाईकीच्या अभंगातून प्रेरणा घेत स्वराज्यासाठी जीवाची कुरवंडी करणारा शिवबाचा एखादा मावळा, तुकोबांच्या आयुष्याचा झगडा प्रत्यक्ष पाहणारी सिऊर गावची संत बहेणाई, अभंग बुडवून पश्चाताप पावलेले रामेश्वर भट, शेतातली कामं सुरू करण्यापूर्वी पहाटेच देवळात जमून तुकोबांची भजनं म्हणणारे गावकरी, (प्रत्यक्ष पांडुरंगही गडबडीनं कमरेवरचे हात काढून वीटेवरून खाली उतरेल, असा टाहो फोडून म्हटली जाणारी वारकरी भजनाची ही धुमाळी अजूनही कुठल्याच सिनेमात दिसलेली नाहीत.)
वह्या बुडवल्याच्या निषेधात तुकोबा १४ दिवस ज्या शिळेवर बसले होते ती शिळा, तुकारामांच्या काळातली राजकीय, सामाजिक उलथापालथ आणि भयाण दुष्काळाच्या साक्षीदार असणा-या देहूतल्या विठोबा रखुमाईच्या मूर्ती, अशी कितीतरी दृश्ये. दुसरीकडं डिस्कव्हरीचा एक सर्व्हे सुरू आहे. शेक्सपिअरच्या जन्मभूमीत राहणा-या किती नागरिकांना शेक्सपिअरच्या साहित्यातले उतारे पाठ आहेत. आणि महाराष्ट्रातल्या अडाणी लोकांना तुकारामाचे किती अभंग पाठ आहेत... 
रिमिक्स होऊद्या, रिमेक होऊद्या, थ्रीडी येऊद्या, डिजिटल येऊद्या. पण प्रतिभावंतहो, तुकारामावर पुन्हा एखादा खणखणीत न् ठणठणीत सिनेमा येऊ द्या हो. तुमचं ऑस्करबिस्कर झक् मारत त्याच्या मागं येतंय की नाही ते बघा.



Tuesday 8 November 2011

पु. ल. आठवण

पु. ल.ना माणसं जोडण्याचा नाद होता. राजकारणी असो वा शाळामास्तर. पु. ल.ना एकदा भेटले की त्यांच्यावर फिदाच होत. पहिल्याच भेटीत पु. लं.च्या प्रेमात पडलेले असेच एक गुरुजी मला पु. ल.च्या आठवणी सांगत. त्यातली पहिल्या भेटीची आठवण मी म.टा.च्या अविष्कार पुरवणीत लिहिली होती...


                     (कृपया फोटोवर क्लिक करा)

Monday 7 November 2011

खुदा पंढरीचा

काल झाली कार्तिकी एकादशी आणि आज बकरी ईद. हिंदू-मुस्लिम बंधुभावाचं नातं सांगत हे सण दरवर्षी असे हातात हात घालून येतात. हे प्रेमाचं नातं जपलं, महाराष्ट्रातल्या वारकरी पंथानं. यानिमित्तानं आम्ही 'खुदा पंढरीचा' हा विशेष कार्यक्रम तयार केला. त्यात आम्ही श्रीविठ्ठलाच्या भक्तीत रमलेल्या मुस्लिम संतांचं जीवनकार्य दाखवलं. त्याचं हे स्क्रिप्ट...


भेदाभेद भ्रम अमंगळ
कार्तिकी एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. हा दिवस म्हणजे भेदाभेद दूर करण्याचा दिवस. जगातली सर्व माणसं इथून तिथून सारखीच आहेत. त्यांच्यात कसला भेद? हा भेद म्हणजे सारा अमंगळपणा. सारा भ्रम, असं संत तुकोबारायांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय. वारकरी पंथाची समतेची परंपराच त्यांनी सांगून ठेवलीय.

Sunday 6 November 2011

गर्दीची नशा, हशा-टाळ्यांची झिंग!

अत्रे विविध आहेत. ते महाराष्ट्राला माहितही आहेत. पण हे अत्रे मी पुन्हा एकदा सांगणार आहे. मला कळलेले. त्याला विश्लेषण म्हणा हवं तर. त्यांच्यावर जमेल तसं लिहित राहीन. त्यांच्या लेखनाचं झालेलं आकलन मांडीन. चर्चा करीन. कारण महाराष्ट्र आणि मराठी माणूस समजून घ्यायचा असेल, तर अत्रे वाचायलाच हवेत.
'लोकप्रभा' दिवाळी अंकासाठी मी 'गर्दीची नशा, हशा-टाळ्यांची झिंग!' नावाचा भला मोठा लेख दिला होता. जागेअभावी तो मागे पडला. मग या अंकात तो कमी करून का होईना, छापला गेला...


‘‘त्यांचे व्याख्यान जाहीर झाले म्हणजे, लक्षावधी श्रोतृवृंद तासन् तास मार्गप्रतीक्षा करीत बसतो. चंद्रोदय होण्याआधीच जनसागराला भरती आलेली असते. आणि प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात झाली म्हणजे हास्यरसांच्या लाटांवर लाटा उसळू लागतात. हशा आणि टाळ्यांच्या गर्जनांनी आसमंत निनादून जातो...’’

Thursday 27 October 2011

सुख वाटे जीवा


परवा धनतेरस न् काल लक्ष्मीपूजन झालं. दिवाळीचा संबंध असा धनाशी, समृद्धीशी. ऐश्वर्याचा उजेड घेऊन आनंदाची दिवाळी तुमच्याही अंगणात येवो, असे एसएमएस येतायत. त्यातला एक होता,
चला, शब्दांचं धन गोळा करूया...
क्षणात तुकोबाराय डोळ्यापुढं उभे राहिले. पांढरी सुती पगडी, बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा...असे कधीही, कुठेही आठवतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, सकाळ, संध्याकाळी, रात्री अपरात्री, प्रवासात, सुखात, दु:खात, जिथं जातो तिथं माझे हे आजोबा सोबत असतात. आलिया आघात निवाराया, मागे पुढे उभेअसतात.
अडचणीत काळंजून बसता, त्यांचे शब्द उजेड होऊन येतात. सोबत इंद्रायणीचा निर्मळ खळखळाट...
आम्हा घरी धन शब्दांची रत्ने।
 शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
 शब्दें वाटू धन जनलोकां।। ...
जीवाला सुख कशा कशानं वाटलं, वाटतं हे जरा आठवून पाहावं.
जगाच्या कुठल्या भाषेत असलं धन असेल काय हो?

Tuesday 18 October 2011

जुन्नर देश

पुणे जिल्ह्यातला जुन्नर परिसर म्हणजे इतिहासप्रेमी आणि संशोधकांची पंढरी. 
हा मावळपट्टा जितक्या वेळा पाहाल तितक्या वेळा वेड लावेल. लाखो वर्षांपूर्वींच्या ज्वालामुखीच्या राखेपासून, हजारो वर्षांपूर्वी कातळात कोरलेल्या शेकडो बौधलेण्यांपासून, सातवाहनांच्या नाणेघाटातल्या जकातीच्या प्राचीन रांजणांपासून ते शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यापर्यंत. किती पाहावे अन् किती डोळ्यांत साठवावे!

लेण्यांमधल्या बौद्ध भिख्खूंनी इथल्या औषधी वनस्पतींनी असाध्य व्याधींवर इलाज केले. इथल्याच नाणेघाटानं महाराष्ट्र देश सातासमुद्रापलिकडच्या परदेशाशी जोडला. उत्तरेकडून येणारी सैन्यदळं याच मार्गानं महाराष्ट्रात उतरली. इथल्या जुन्नरी’ कागदावर हजारो पोथ्या लिहिल्या गेल्या. गो-या साहेबालाही या प्रदेशाचा मोह पडला. इथल्या हरिश्चंद्र गडावरच्या कोकणकड्यावरून दिसलेलं वर्तुळाकार इंद्रधनुष्य पाहून इंग्रज कलेक्टर वेडा झाला न् त्यानं इथं प्रतिमहाबळेश्वरच उभारायला सुरुवात केली. इथल्या नानाविध वनस्पती पाहून अधिकारी गिब्सन हरखला न् त्यानं कुटुंबासह इथं कायमचा मुक्काम ठोकला. तोच पुढं भारताचा पहिला वनाधिकारी ठरला.

Thursday 6 October 2011

नाद खुळा!

लोकप्रभासाठी हा लेख लिहायचा होता, त्यापूर्वी पराग पाटलांशी बोलणं झालं. ते बैलाविषयी लिहिणार होते. पण त्यांच्याशी बोलताना मला बैलाबाबत काहीही आठवेना. त्यानंतर आज सकाळीच त्यांचा बैलोबा’ नावाचा लेख वाचला. (http://www.loksatta.com/lokprabha/20111014/desktop.htm) बैल माणसाच्या सोबत कधीपासून आहे, त्याचा धांडोळा घेतलाय त्यांनी त्यात.
लेख वाचत वाचत निम्म्यावर आलो. बिरबलाच्या गोष्टीजवळ. पुढच्या ओळी वाचता वाचता अचानक मन थरथरलं. अंगावर नकळत काटा फुलारला.
‘‘ आजच्या पिढीला बैलाच्या चमकदार त्वचेची थरथर, शेपटीने ढाळलेल्या चवऱ्या, वाशिंडाचा लयबद्ध बाक आणि गळ्याच्या त्वचेच्या मखमली लाटांचा अनुभव कसा मिळावा...’’ अशा त्या ओळी.
आपण बैलाच्या मानेजवळ बसलोत. त्याची गळ्याची पोळी खाजवून देतोय. तो हळू हळू अंगाला डोकं घासतोय. असं क्षणभर वाटलं. आणि त्यादिवशी बोलण्यात न आठवलेलं काय काय आठवलं.
बैल. गाण्याच्या चालीवर मोट ओढणारे. सरळ रेषेत नांगरट करणारे. खळ्यातल्या कणसांच्या ढिगातून गोल गोल फिरणारे. गळ्यातल्या घुंगुरमाळा वाजवत बैलगाडी पळवणारे. मांडवाच्या दारात न् दिवाळीत पणतीच्या उजेडात ओवाळून घेणारे. यात्रेत न् बैलपोळ्याच्या मिरवणुकीत भंडार उधळून घेणारे. मालकाची शीळ ऐकत ओहळाचं निव्वळशंख पाणी पिणारे. एकमेकांच्या शेजारी उभे राहून कुडुम कुडुम कडबा खाणारे. पुरणाची पोळी खाताना खरखरीत जीभेनं हात चाटणारे. आणि पुस्तक वाचण्यात दंग असताना कानाला मागून नाकाचा ओलसर स्पर्श करत उच्छवास सोडणारे. बैल.

Monday 3 October 2011

चैत्रामची गोष्ट

चैत्राम पुण्याजवळच्या मोशीच्या माळावर भेटला होता. २००४च्या डिसेंबर महिन्यात. कृषीप्रदर्शनात. गर्दीत अंग चोरून बसला होता. म्हटलं वा व्वा, नाव छानै तुझं चैत्राम. त्यावर मला कोपरखळी मारत आमचे मित्र सुनील माने म्हणाले, नावापेक्षाही काम मोठंय, रंगराव चैत्रामचं. मग बुजरा चैत्राम हळू हळू बोलता झाला.
युवा सकाळमध्ये या धडपड्या आदीवासी तरुणाची गोष्ट मी लिहिली होती.

गोष्ट वाचावी, ऐकावी, इतरांना सांगावी अन् बोध घ्यावी अशी आहे. गोष्ट आहे, धुळे जिल्ह्यात दूर डोंगरात वसलेल्या, विकासाचा वसा घेतलेल्या बारीपाडा या आदीवासी पाड्याची अन् पाड्याच्या भल्यासाठी झटणा-या चैत्राम नावाच्या तरुणाची. पाड्यात भिल्ल आणि कोकरी जातीचे साडेसातशे आदीवासी.

Tuesday 20 September 2011

साहेब


राजकारण म्हणजे गुंडापुंडाचा, काळं बेरं करणा-या, चालू लोकांचा धंदा. राजकारणाच्या नादाला भल्या माणसानं लागू नये, असं म्हणतात. मग मनात विचार येतो, राजकारणात कधी चांगली माणसं नव्हती का? नाहीत का? डोळ्यापुढं नावंच येत नाहीत. बोटावर मोजण्याएवढीही नाहीत. पण असा एक भला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणानं पाहिला होता. मी पाहिला होता. त्यांचं नाव साहेबराव बुट्टेपाटील. पुण्यातल्या खेड तालुक्याचे माजी आमदार.

Friday 16 September 2011

शाहिरांच्या देशा


आता कुठं जरी खुट्ट झालं की काही सेकंदात जगभर बातमीचा वणवा पसरतो. ही सगळी मीडियाची किमया. भारतभर लोकपाल आंदोलन चेतवणा-या अण्णांनीही मीडियाला श्रेय दिलं. पण ५० वर्षांपूर्वीचा मीडिया काय होता? तो लोकांपर्यंत किती पोहोचत होता? असा विचार करू लागलो तर समोर येतं, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन.
संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा गावोगावी पोहचवण्याचं, मराठी मनं पेटवण्याचं ऐतिहासिक काम एका प्रभावी मीडियानं केलं. हा मीडिया म्हणजे लोकशाहीर आणि त्यांची गगन भेदून टाकणारी शाहिरी. या शाहिरांना टाळून महाराष्ट्राला पुढं जाताच येणार नाही.

Thursday 15 September 2011

शांताबाई


शांता शेळकेंची एक आठवण आहे. त्या माझ्या गावच्या. म्हणजे, मी त्यांच्या गावचा. मंचरचा!
पुण्यात राजन खान नावाचे एक अत्यंत खटपटे गृहस्थ आहेत. एसपी कॉलेजात असताना मी शेपटासारखं त्यांच्या मागे मागे फिरे.

एकदा ते म्हणाले, 'आपापल्या तालुक्याची इत्थंभूत माहिती देणारं फोन डिरेक्टरी टाईप एक पुस्तक आपण लोकांना देऊ. मोफत. तू तुझ्या तालुक्यापासून सुरुवात कर.' मी म्हणालो, आणि त्यासाठी पैसे? म्हणाले, आपण जमवायचे. म्हणजे तू. अहो, मला कोण ओळखणार आणि कोण पैसे देणार? म्हणाले, जा. आता नोकरी शोधत हिंडालच ना, मग पहिल्यांदा 'नकार झेलायला' शिका. जाहिरातीही गोळा करा. 

Wednesday 14 September 2011

संगणकातला मराठी माणूस

शिवाजीराव आढळराव पाटील तेव्हा खासदार नव्हते. ते होते, संगणक क्षेत्रातले यशस्वी मराठी उद्योजक. महाराष्ट्र टाइम्सच्या अविष्कार पुरवणीत मी त्यांची यशोगाथा लिहिली होती. 

                                                         (कृपया फोटोवर क्लिक करा)
                                                      

Monday 12 September 2011

आमदार

पत्रकारितेचा कोर्स करत असताना आमुची नवदृष्टी लोकप्रतिनिधींवर अर्थात आमदारांवर पडली. पुढारी, राजकारणी, गेंड्याच्या कातडीचे, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे अशा विशेषणांनीच त्यांची शाळकरी वयापासून ओळख झालेली.

मनात विचार आला, ही मंडळी करतात तरी काय? जुन्या आमदारांनी काय केले असेल? तेही असेच असतील काय? त्या काळची परिस्थिती कशी असेल? झाले, लगेच कामाला लागलो. आजीमाजी आमदारांचा शोध सुरू झाला. खेड, आंबेगाव, जुन्नर हे कार्यक्षेत्र. या तालुक्याच्या पहिल्या आमदारापासूनची माहिती जमवायला सुरुवात केली. अगदी आटापीटा केला.

एखादा वयोवृद्ध आमदार गतकाळातल्या आठवणी तासन् तास सांगत बसायचा. एखाद्या दिवंगत आमदाराच्या मुलाकडं वडिलांचा साधा फोटोदेखील नसायचा. तर एखादे आजी आमदारसाहेब स्वत:बद्दलची माहिती सांगायलाही अनेक हेलपाटे मारायला लावायचे.
पण कंटाळलो नाही. नेटानं माहिती जमवत राहिलो.
विधानसभा लायब्ररीत गेलो. ग्रंथपाल म्हणाले, आमच्याकडंही माहिती नाही हो. खरं आपल्याकडं असं काम व्हायला पाहिजे. राजस्थान विधानसभेच्या ग्रंथालयात आमदारांची किती तरी व्यवस्थित, अपडेट माहिती मिळते. इथं काही आमदारांनी स्वत:विषयी जुजबी माहिती भरून दिलेले काही फॉर्म मात्र मिळाले.

स्वातंत्र्याची ५० वर्षे

स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली तेंव्हा आम्ही विद्यार्थी'दशेत' होतो. तेव्हाच आम्ही आमचे मौलिक विचार व्यक्त करू लागलो होतो. 'पिंपरी-चिंचवड टुडे'च्या दिवाळी अंकातला हा त्या काळातला ऐतिहासिक लेख..smile

                                                           (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                         
                                                         (कृपया फोटोवर क्लिक करा)

Sunday 11 September 2011

विघ्नकर्ता-विघ्नहर्ता

आज गणपतीविसर्जन. सर्वांनी जड अंत:करणानं बाप्पाला निरोप दिलाय. आजच्याच मटात स. रा. गाडगीळ यांच्या लोकायत नावाच्या पुस्तकाविषयी छापून आलंय. यात गणपतीच्या सांस्कृतिक प्रवासाची तोंडओळख करून देण्यात आलीय. श्रीगणेशाचा विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता हा प्रवास, त्यामागचं राजकारण याचा उहापोह करण्यात आलाय. यानिमित्तानं मला चार वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या लेखाची आठवण झाली. श्रीगणेशाचं मूळ रुप शोधणा-या या लेखाच्या चार पानांपैकी दोनच सापडली. त्यातला हा मजकूर...

Tuesday 30 August 2011

वायाळ गुरुजी

धोतर, टोपी घातलेले अण्णा क्लिक झाले. मीडियाचे, देशाचे हिरो झाले. पण हे होण्याअगोदर अण्णा कित्येक वर्षे राबलेत. गावच्या विकासासाठी त्यांनी दिवसरात्र एक केलेत. असे अनेक अण्णा महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांत आहेत. माझ्या ओळखीचे असे एक गुरुजी आहेत, ज्यांना त्यांच्या कामातच रामसापडलाय.




भु-या आला..! म्हणताच, कोंबडीनं पटापट पिलं पंखाखाली घ्यावीत तशी अंगणात खेळणारी पोरंटोरं आज्यांच्या पाठीमागं दडली. झोपड्यांची गवती दारं बंद झाली. आणि कलकलणारी ठाकरवाडी चिडीचूप झाली. कर्ते बापे-बाया रानात गेले असताना वस्तीवर आलेलली ही पीडाच. पांढ-या कपड्यातला माणूस म्हणजे, त्यांच्या दृष्टीने पीडाच. कारण असा माणूस असायचा एखादा तणतण करत आलेला मळेवाला. किंवा हक्काचे मजूर न्यायला आलेला बागायतदार. त्याला ठाकरी भाषेत म्हणायचं भु-या’.
पण यावेळचा भु-या जरा वेगळा होता. शुभ्र पायजमा, शर्ट, गांधीटोपी. चेह-यावर मायाळू भाव. हे होते, गुरुजी. वाडीवर शाळा सुरू करायला आलेले, वायाळगुरुजी. गुरुजींना शाळेची इमारत काही दिसेना. झोपड्या बंद. विचारावं कोणाला?
गुरुजी समजले. उमजले. शाळा सुधारली तर ठाकरवाडी सुधारेल. मग त्यांनी कंबरच कसली.