'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday 27 October 2011

सुख वाटे जीवा


परवा धनतेरस न् काल लक्ष्मीपूजन झालं. दिवाळीचा संबंध असा धनाशी, समृद्धीशी. ऐश्वर्याचा उजेड घेऊन आनंदाची दिवाळी तुमच्याही अंगणात येवो, असे एसएमएस येतायत. त्यातला एक होता,
चला, शब्दांचं धन गोळा करूया...
क्षणात तुकोबाराय डोळ्यापुढं उभे राहिले. पांढरी सुती पगडी, बाराबंदी, गळ्यात तुळशीच्या माळा...असे कधीही, कुठेही आठवतात. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, सकाळ, संध्याकाळी, रात्री अपरात्री, प्रवासात, सुखात, दु:खात, जिथं जातो तिथं माझे हे आजोबा सोबत असतात. आलिया आघात निवाराया, मागे पुढे उभेअसतात.
अडचणीत काळंजून बसता, त्यांचे शब्द उजेड होऊन येतात. सोबत इंद्रायणीचा निर्मळ खळखळाट...
आम्हा घरी धन शब्दांची रत्ने।
 शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन।
 शब्दें वाटू धन जनलोकां।। ...
जीवाला सुख कशा कशानं वाटलं, वाटतं हे जरा आठवून पाहावं.
जगाच्या कुठल्या भाषेत असलं धन असेल काय हो?

Tuesday 18 October 2011

जुन्नर देश

पुणे जिल्ह्यातला जुन्नर परिसर म्हणजे इतिहासप्रेमी आणि संशोधकांची पंढरी. 
हा मावळपट्टा जितक्या वेळा पाहाल तितक्या वेळा वेड लावेल. लाखो वर्षांपूर्वींच्या ज्वालामुखीच्या राखेपासून, हजारो वर्षांपूर्वी कातळात कोरलेल्या शेकडो बौधलेण्यांपासून, सातवाहनांच्या नाणेघाटातल्या जकातीच्या प्राचीन रांजणांपासून ते शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यापर्यंत. किती पाहावे अन् किती डोळ्यांत साठवावे!

लेण्यांमधल्या बौद्ध भिख्खूंनी इथल्या औषधी वनस्पतींनी असाध्य व्याधींवर इलाज केले. इथल्याच नाणेघाटानं महाराष्ट्र देश सातासमुद्रापलिकडच्या परदेशाशी जोडला. उत्तरेकडून येणारी सैन्यदळं याच मार्गानं महाराष्ट्रात उतरली. इथल्या जुन्नरी’ कागदावर हजारो पोथ्या लिहिल्या गेल्या. गो-या साहेबालाही या प्रदेशाचा मोह पडला. इथल्या हरिश्चंद्र गडावरच्या कोकणकड्यावरून दिसलेलं वर्तुळाकार इंद्रधनुष्य पाहून इंग्रज कलेक्टर वेडा झाला न् त्यानं इथं प्रतिमहाबळेश्वरच उभारायला सुरुवात केली. इथल्या नानाविध वनस्पती पाहून अधिकारी गिब्सन हरखला न् त्यानं कुटुंबासह इथं कायमचा मुक्काम ठोकला. तोच पुढं भारताचा पहिला वनाधिकारी ठरला.

Thursday 6 October 2011

नाद खुळा!

लोकप्रभासाठी हा लेख लिहायचा होता, त्यापूर्वी पराग पाटलांशी बोलणं झालं. ते बैलाविषयी लिहिणार होते. पण त्यांच्याशी बोलताना मला बैलाबाबत काहीही आठवेना. त्यानंतर आज सकाळीच त्यांचा बैलोबा’ नावाचा लेख वाचला. (http://www.loksatta.com/lokprabha/20111014/desktop.htm) बैल माणसाच्या सोबत कधीपासून आहे, त्याचा धांडोळा घेतलाय त्यांनी त्यात.
लेख वाचत वाचत निम्म्यावर आलो. बिरबलाच्या गोष्टीजवळ. पुढच्या ओळी वाचता वाचता अचानक मन थरथरलं. अंगावर नकळत काटा फुलारला.
‘‘ आजच्या पिढीला बैलाच्या चमकदार त्वचेची थरथर, शेपटीने ढाळलेल्या चवऱ्या, वाशिंडाचा लयबद्ध बाक आणि गळ्याच्या त्वचेच्या मखमली लाटांचा अनुभव कसा मिळावा...’’ अशा त्या ओळी.
आपण बैलाच्या मानेजवळ बसलोत. त्याची गळ्याची पोळी खाजवून देतोय. तो हळू हळू अंगाला डोकं घासतोय. असं क्षणभर वाटलं. आणि त्यादिवशी बोलण्यात न आठवलेलं काय काय आठवलं.
बैल. गाण्याच्या चालीवर मोट ओढणारे. सरळ रेषेत नांगरट करणारे. खळ्यातल्या कणसांच्या ढिगातून गोल गोल फिरणारे. गळ्यातल्या घुंगुरमाळा वाजवत बैलगाडी पळवणारे. मांडवाच्या दारात न् दिवाळीत पणतीच्या उजेडात ओवाळून घेणारे. यात्रेत न् बैलपोळ्याच्या मिरवणुकीत भंडार उधळून घेणारे. मालकाची शीळ ऐकत ओहळाचं निव्वळशंख पाणी पिणारे. एकमेकांच्या शेजारी उभे राहून कुडुम कुडुम कडबा खाणारे. पुरणाची पोळी खाताना खरखरीत जीभेनं हात चाटणारे. आणि पुस्तक वाचण्यात दंग असताना कानाला मागून नाकाचा ओलसर स्पर्श करत उच्छवास सोडणारे. बैल.

Monday 3 October 2011

चैत्रामची गोष्ट

चैत्राम पुण्याजवळच्या मोशीच्या माळावर भेटला होता. २००४च्या डिसेंबर महिन्यात. कृषीप्रदर्शनात. गर्दीत अंग चोरून बसला होता. म्हटलं वा व्वा, नाव छानै तुझं चैत्राम. त्यावर मला कोपरखळी मारत आमचे मित्र सुनील माने म्हणाले, नावापेक्षाही काम मोठंय, रंगराव चैत्रामचं. मग बुजरा चैत्राम हळू हळू बोलता झाला.
युवा सकाळमध्ये या धडपड्या आदीवासी तरुणाची गोष्ट मी लिहिली होती.

गोष्ट वाचावी, ऐकावी, इतरांना सांगावी अन् बोध घ्यावी अशी आहे. गोष्ट आहे, धुळे जिल्ह्यात दूर डोंगरात वसलेल्या, विकासाचा वसा घेतलेल्या बारीपाडा या आदीवासी पाड्याची अन् पाड्याच्या भल्यासाठी झटणा-या चैत्राम नावाच्या तरुणाची. पाड्यात भिल्ल आणि कोकरी जातीचे साडेसातशे आदीवासी.