रस्त्यावर उतरून लढणा-या देशभरातल्या स्त्रियांचं लिखाण मराठीत येतंय. मनोविकास प्रकाशनने हे शिवधनुष्य उचललंय. तब्बल ४० पुस्तकांची ‘भारतीय लेखिका’ नावाची ही मालिका आहे. पैकी ११ पुस्तकं तयार झालीत. त्यांची ‘लोकप्रभा’मधून करून दिलेली ही ओळख...
एखादं गाव किती शहाजोग आहे, याचा कानोसा घ्यायचा असेल तर पाणवठ्यावर गावातल्या बायका काय काय बोलतात ते ऐकावं असं म्हणतात. मोठ्या समाजाबद्दलही तसंच म्हणता येईल. कुठलाही समाज किती निकोप आहे किंवा प्रगतीची किती शेखी मिरवतो, हे समजून घ्यायचं असेल तर त्या समाजातील स्त्रियांचं लिखाण वाचावं. अगदी लख्ख प्रतिबिंब उभं राहील. हे लिखाण म्हणजे समाजाचा आरसाच. पण बाई बोलते म्हटल्यावर लगेचच कान टवकारतात. आपल्याविषयीच काही तरी बडबडतेय असं लक्षात आलं तर अगोदर तिचं तोंड बंद केलं जातं. गपगुमान राहण्याची तंबी दिली जाते. खेडेगावातल्या एखाद्या छोट्या कुटुंबापासून तर जगभरातल्या प्रगत, अप्रगत समाजात हेच चित्र दिसतं.