'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 2 October 2016

सण शेतकरी राजाचा

सध्याच्या सोशल मीडियातही महाराष्ट्र सरकारचं शेतकरी मासिक खेडोपाडी, शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय आहेत. दिवाळी अंकातला लेख वाचल्याचे फोन मला वर्षभर येत होते. २०१४च्या दिवाळी अंकात लिहिलेला हा लेख...

गच्च हिरव्या भाद्रपदानंतरचा निरभ्र आभाळाचा अश्विन महिना सरत आला की,
हलक्या पावलांनी येणार्‍या गोड थंडीसोबतच दिवाळीची चाहूल लागते. शेताशिवारात बाराही महिने राबणाऱ्या खेड्यांपाड्यांतून
"दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी
गायी म्हशी कुणाच्या, लक्षुमनाच्या...''
हे गाणं ऐकू येतं. अवतीभोवतीचं जग कितीही बदलो; पण दिवाळीचं हे गाणं बदललेलं नाही. शहरी संस्कृती जगणं वेढून टाकत असताना हे गाणं ग्रामीण जीवन जागतं असल्याची जाणीव करून देतं. आपले सगळेच सणवार निसर्गातील कुणा ना कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे. पण दिवाळी म्हणजे काबाड कष्ट उपसत सार्‍या दुनियेला अन्नधान्य पुरविणार्‍या बळीराजाचे ऋण व्यक्त करणारा सण. वरील लोकगीतातला लक्ष्मण म्हणजे मळ्यात राबणारा, आपल्या गायी, म्हशी,
गुरा-ढोरांना मायेनं सांभाळणारा शेतकरी राजा. त्याला राजा का म्हणायचं कारण, तो सगळ्यांचा पोशिंदा असतो म्हणून. दिवाळी म्हणजे काही केवळ शहरांमधून साजरी होणारी झगमगाटी रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी नव्हे. तर, ती खरीखुरी आहे, या बळीराजाच्या जगण्यातील आनंदाची सुगी.

संततधार पावसाळा नुकताच संपलेला असतो. सुगीचे दिवस सुरू झालेले असतात. खळ्यात धान्याच्या राशी उभ्या असतात. हिरवा चारा खाऊन गुरंढोरं पुष्ट झालेली असतात. विहिरी, नद्या नितळ पाण्याने भरून वाहत असतात. आपल्याला हे सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या आपल्या गुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा त्यांची पूजा करतो ती दिवाळीच्या वसुबारसेला. गोठ्यातल्या गाय वासराला गोडधोड खायला घातलं जातं. 'आपल्या शेतीसाठी बैलजोडी दे' म्हणून गायीला हात जोडले जातात. मग शेतातल्या बाजरीची भाकरी, तिच्यावर लोणी, उडदाचे वरण घरच्या गुळाच्या करंज्या असा फराळाचा बेत होतो.

दिवाळीचे चार दिवस घरं पै पाहुणे, मुलीबाळी, नातवंडांनी गजबजतात. मायेच्या नात्यांना उजाळा मिळतो. भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणीचा भरला संसार पाहण्यासाठी भाऊ सहकुटुंब जातो, तेव्हा बहिणीला कोण आनंद होतो. भाऊबीजेची वर्णन करणारी अनेक सुंदर लोकगीतं आपल्या मौखिक परंपरेत आहेत.
"दिवाळीचा दिवा मला धार्जिणी झाला
भावाच्या बरोबरी भाचा भेटाया आला..."
भाऊबीजेला बहिणीच्या घरी असा आनंदोत्सव असतो. बहिणीचा सुखी संसार पाहून भाऊही भरून पावतो. भावाला काय खाऊ घालू अन् काय नको, असे तिला होते.
"आंबेमोहोर तांदळाला ठेवते दुधाचे आधण
भाऊबीजेला आला, मायबाईचा साजण
आंबेमोहोर तांदळाला देते तुपाचा शिडका
भाऊबीजेला गं आला पाहुणा भाऊ लाडका..."
दिवाळसण नातीगोती अशी घट्ट करतो.

महाराष्ट्रातील विविध भागांतील शेतकरी विविध प्रकारे दिवाळी साजरी करतात.
मराठवाड्यातले गुराखी धन त्रयोदशीपासून लव्हाळ्याची अर्थात पुरुषभर उंचीच्या गवताची दिवटी विणायला सुरुवात करतात. पाच दिवस त्या दिवटीने आपल्या गुरांना ओवाळतात. महिला शेणाच्या गवळणी तयार पाच पांडव तयार करून त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. गुरांच्या पुढच्या पायावर चंद्र आणि मागच्या पायावर दह्याने सूर्य काढण्याचीही प्रथा गुराखी समाजात आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत हे गोधन आपल्या घरी राहावे, अशी प्रार्थना यावेळी केली जाते. हे शेणाचे पांडव नंतर शेतात नेऊन जाळतात. त्यावर दूध तापवतात. ते उतू दिले जाते. शेतातील पीकही तेवढेच भरभरून ओसंडून येऊ दे, अशी त्यामागील भावना असते.

काही ठिकाणी आदिवासी समाजात बलिप्रतिपदेच्या दिवशी गावाबाहेर गवत पेटवून त्या धुरातून जनावरांना पळवतात. त्यामुळे गुरांना आजार होत नाहीत, अशी त्यामागील समजूत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निसर्गातील देवतांची पूजा
केली जाते. ऊस, काकडी अशा पदार्थांचा प्रसाद दाखवला जातो .
धनगर समाजात पाडव्याच्या दिवशी मेंढा-मेंढीचं लग्न लावलं जातं. पाडव्याचा दिवशी बळीराजाच्या स्वागतासाठी अंगणात तांदळाच्या पीठाची रांगोळी रेखाटली जाते. बळीराजाचे प्रतिक म्हणून शेणगोळ्यांवर झेंडूचे फूल ठेवून त्याची पूजा करतात. कोकणातही अशी बळीराजाची पूजा मांडली जाते. पाडवा हा दिवाळीचा मुख्य दिवस. याच दिवशी बलीप्रतिपदा असते. म्हणजे बळीराजाचा अर्थात शेतकर्‍यांच्या राजाचा उत्सव. या विष्णूभक्त राजाने आपल्या बळावर स्वर्ग जिंकण्याची तयारी केली. मग देवांच्या विनंतीनुसार श्री विष्णूंनी त्याला पाताळाचे राज्य दिले; पण पृथ्वीवरील प्रजेच्या
प्रेमापोटी बळीराजा पुन्हा पृथ्वीवर आला. तोच दिवस बलीप्रतिपदेचा. 

महात्मा जोतिराव फुले यांनी या शेतकर्‍यांच्या या राजाचं महत्त्व जनतेच्या लक्षात आणून दिलं. दिवाळी ही खर्‍या अर्थाने बळीराजाची अर्थात शेतकर्‍याची आहे, हे ठसवलं. म्हणूनच आजही घराघरांत 'इडा पिडा टळो, बळीचं राज्य परत येवो, असे म्हणत बळीराजाची पूजा केली जाते. आज जग बदलतंय. सर्व क्षेत्रांमध्ये विकास, प्रगती घडवून आणण्याचा आपल्या देशानं निश्चय केलाय. मात्र यात उपेक्षा होते आहे, ती मूळ गोष्टीची. शेतीची, शेतकर्‍यांची. मायबाप सरकारच्या हे वेळीच लक्षात येवो आणि कृषीजीवन समृद्ध करणार्‍या बळीचे राज्य येवो, अशी प्रार्थना या दिवाळीच्या निमित्ताने आपण करुयात.

No comments:

Post a Comment