'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Monday 20 December 2010

अमृताचा घनू

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा ८२वा वाढदिवस होता. 'आयबीएन-लोकमत'तर्फे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी लतादीदींची दीर्घ मुलाखत घेतली. मी ती शब्दबद्ध केली. लोकमतनं ही मुलाखत सर्व आवृत्त्यांमध्ये छापली...



लता मंगेशकर ..!
कोट्यवधी रसिकमने झंकारणारा स्वर्गीय सूर... गेली ६८ वर्षे हा अमृताचा घनू अखंडपणे बरसतो आहे... या गानकोकिळेनं अर्थात रसिकांच्या लाडक्या लतादीदींनी आयुष्यातील काही अस्पर्श क्षण अजूनही जपून ठेवले आहेत. हा ठेवा त्यांनी उघड केलाय, 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना. त्यांच्या ८२व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा मनमोकळा संवाद साधलाय, त्यांचा लाडका बाळ अर्थात पं. हृदयनाथ मंगेशकरांशी....


पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी तू गेली ६८ वर्षे गातेस. १९४२ला बाबा गेले, त्याच वर्षी तू गायला सुरुवात केलीस. आता मागे वळून बघताना तुला काय वाटते?

लता मंगेशकर - गेले ते दिवस खूप चांगले गेले. मी ६८ वर्षांपेक्षा जास्त गाते आहे. ९ वर्षांची असताना सोलापूरला थिएटरमध्ये बाबांसोबत मी क्लासिकल प्रोग्रॅम केला. १९३८-३९ सालची ही गोष्ट आहे. त्याच्याही आधी मी गात होते. बाबांसोबत मी अनेक कार्यक्रम केले. आपली बलवंत संगीत मंडळी कंपनी बंद झाल्यानंतर मी बाबांसोबत प्रत्येक कार्यक्रमात गायले.



पं. हृदयनाथ मंगेशकर - तुझं पहिलं गाणं कोणतं?
लता मंगेशकर - मी त्या वेळी पाच वर्षांची होते. घरात बाबांचा एक शिष्य गात होता. त्याला रियाज करायला सांगून बाबा बाहेर गेले होते. मी गच्चीमध्ये खेळताना त्याचे गाणे ऐकले आणि आतमध्ये जाऊन त्याला त्याच्या गाण्यातील चुका सांगितल्या. असे नाही, असे आहे म्हणून त्याला गाऊनही दाखवले. बाबांनी ते बाहेरून ऐकलं. लहानपणी आपलं घर मोठं होतं. स्वयंपाकघरातील डब्यांच्या मोठ्या स्टँडवर बसून मी आपल्या स्वयंपाक्याला मोठमोठ्यांनी बाबांच्या चीजा, सैगलची सिनेमातील गाणी ऐकवायची. माई मला तिथून हाकलायची. बाबांनी शिष्याजवळचं ते गाणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता मला उठवलं आणि मला संगीत शिकवायला सुरुवात केली.

पं. हृदयनाथ मंगेशकर - तो राग आणि गाण्याचे शब्द आठवतात का?
लता मंगेशकर - हो. राग होता, पुरिया धनश्री आणि बोल होते, हे सदारंग... नीत उठकर देता दुहाई...

पं. हृदयनाथ मंगेशकर - तुझे पहिले गुरू बाबा होते?
लता मंगेशकर -
अर्थातच. त्यांनी माझ्या गाण्याविषयी माईला सांगितले आणि घरात गवई असताना आम्ही बाहेर का शिकवतो, असे म्हणाले.

पं. हृदयनाथ मंगेशकर - बाबांना तुझ्या गाण्याबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. बाबांसोबत एका नाटकात तू पहिल्यांदा काम केलंस, ती आठवण सांग.
लता मंगेशकर -
ते सौभद्र नाटक होतं. त्यात नारदाचे काम करणारा नट आजारी पडला. बाबा काळजीत पडले. मी खेळत होते. मी ऐकलं आणि बाबांना म्हणाले, मी करते नारदाचं काम... बाबा म्हणाले, नारद एवढासा, अर्जुन केवढा मोठा... कसे दिसेल ते स्टेजवर. पण मी सांगितलं, जरी मी लहान दिसले तरी गाईन तुमच्याबरोबर. मला कॉन्फिडन्स होता. तुला गाणी, नक्कल पाठ आहे का, असं बाबांनी विचारल्यावर मी हो म्हणाले. मग मला बाबांनी गायची परवानगी दिली. आमचे तार्दाळकर नावाचे हार्मोनियमवादक होते. त्यांच्याकडे मी ती गाणी म्हटली. मग माईनं मला रात्री मेकअप केला. माझे लांब केस वरती बांधले. त्यावर फुलं लावली. हातात तंबोरी दिली. पीतांबर नेसवून मला पाठवले. मी बाबांना सांगितलं, मी शेवटच्या गाण्याला वन्समोअर घेणार. नाटकातलं पहिलंच गाणं लोकांना खूप आवडलं. मग बाबांचं गाणं, माझं गाणं असं होतं. ते झाल्यानंतर घाबरू नको, गा, असं बाबांनी सांगितलं. अर्जुन निघून गेल्यावर 'पावना वामना' हे नारदाचं गाणं गात असताना मला वन्समोअर मिळाला. मी बाबांकडे पाहिले... आणि परत ते गाणं गाऊ लागले....

पं. हृदयनाथ मंगेशकर- तुला तांत्रिक प्रश्न विचारतो. बाबांचा सूर सफेद चार, काळी तीन, सफेद पाच असा होता. त्या सुरात तू गायचीस. जन्मत: तुझा सूर उंच होता?
लता मंगेशकर-
हो पहिल्यापासूनच माझा सूर उंच होता. मी सुरुवातीला प्ले बॅक सिगिग सुरू केले, तेव्हा एस. मुखर्जींनी सांगितलं की, हिचा आवाज अगदी पातळ, लहान मुलीसारखा आहे. तो हिरॉईनला मॅच होणार नाही. त्यांनी शहीद सिनेमाला माझा आवाज नाकारला. पण मास्टर गुलाम हैदर मला घेऊन गेले. कामिनी कौशल त्यांची हिरॉईन होती. तिचा आवाज पातळ होता. तिच्याही पेक्षा जाड आवाजाची सुलताना नावाची बाई होती. त्यांनी तिच्यासाठी माझा प्लेबॅक घेतला. माझी गाणी चांगली चालली. नंतर मी नर्गीस, मधुबाला यांच्यासाठी गायले.

पं. हृदयनाथ मंगेशकर- बाबांसोबत तुला रंगमंचाची सवय झाली. बाबांच्या कंपनीत कामाची काय पद्धत होती?
लता मंगेशकर-
बळवंत संगीत कंपनी बाबांनी सुरू केली. बाबा रेडिओसाठी मुंबईला गेले होते. पंढरपुरात गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश होता. ते लहानपणापासून आमच्यासोबत होते. ते 'पुण्यप्रभाव' बाबांशिवाय करणार होते. त्यात बाबांची भूमिका गणूमामा करणार होते. मी त्याला 'पुण्यप्रभाव'मध्ये काम करण्याचा हट्ट धरला. मी गाणी पाठ केली आणि पहिल्यांदा स्टेजवर पाय ठेवला. बाबांसोबत नारद झाले, त्याच्याही ही आधीची गोष्ट. स्टेजवर मी थरथर कापत होते. इतकी घाबरले होते की, मला बोलता येईना. त्या प्रयोगानंतर मात्र मला सराव झाला. मुंबईहून आल्यावर बाबांना हे कळलं. त्यांना नाटकात काम करणे आवडायचे नाही. एवढंच काय पण नाटक बघितलेले, नाटकात काम केलेले, अगदी सिनेमा बघितलेलेही त्यांना आवडायचे नाही. कपडे ते सांगतील तसेच आम्हाला घालायला लागायचे. माईनेही नऊवारी साडीच घालण्याचा त्यांचा आग्रह असे. ते अत्यंत आर्थोडॉक्स होते. तोंडाला पावडर लावायची नाही, मेकअप करायचा नाही, असा त्यांचा दंडक होता.
आम्ही बाबांसमोर काहीच बोलायचो नाही. मला म्हणाले, नाटकात काम केलेस, 'फुट्टल मागे ले' असे गोव्याच्या भाषेत बोलले. तिथे दिनकरराव ढेरे होते. काबंडा नावाने ते प्रसिद्ध होते. त्यांना सांगितले, दिनू, तू याचे म्युझिक कर. ते फार छान गायक होते. यांना कामं करायचीत ना, मी बाल बलवंत संगीत कंपनी काढतो, कोठीवाल्यांना सांगितलं, तुम्ही 'गुरुकुल' लिहा. मी, मीना आणि दोन छोटी मुलं, चंद्रकांत गोखले आणि दोघे जण होते. ते नाटक बसवलं. पहिल्यांदा ते पंढरपूरलाच केलं. दोन-तीन शो करून ते नाटक थांबलं. त्यानंतर मी ते प्रसिद्ध नारदाचं काम केलं.

पं. हृदयनाथ मंगेशकर- गुलजारांनी परिचय नावाचा सिनेमा काढला होता. गाताना नायकाला खोकला येतो. त्याची मुलगी ते गाणं पूर्ण करते, असं गुलजारांनी मला सांगितलं होतं.
लता मंगेशकर-
खोटं आहे ते. माझ्या आयुष्यात असा प्रसंग कधीही घडला नाही. मी भैरवी नावाचा सिनेमा काढणार होते. रोशनलाल म्युझिक डायरेक्टर होते. त्याचा मुहूर्त नौशादनी केला. त्या सिनेमात दिनकरराव पाटलांनी असा प्रसंग घातला होता. पण तो पिक्चर झाला नाही. तो प्रसंग राजकपूरने 'सत्यम् शिवम् सुंदरम्'मध्ये घातला.

पं. हृदयनाथ मंगेशकर- संगीत दिग्दर्शकाची चाल आणि नायिकेचं वय यांच्याशी तू नेहमी एकरूप होतेस. त्यासाठी तू काही खास प्रयत्न केलेस का?
लता मंगेशकर-
मी अनेक लहान मुलांसाठी गायले. लक्ष्मीकांत प्यारेलालसाठी 'ज्ञानेश्वर'मध्ये मी एक गाणं गायलं. 'एक दोन तीन चार, भैया बनो होशियार' हे मुक्ताबाईच्या तोंडी गाणं होतं. मी पंधरा-वीस मिनिटे गप्प बसून विचार केला की, लहान मुलगी कशी गाईल... लहान मुले काही ताना मारून गात नाहीत. माझ्या मते मी ते गाणं अत्यंत चांगलं गायलं आहे.

पं. हृदयनाथ मंगेशकर- दीदी तू ज्ञानेश्वरांच्या विराण्या फार चांगल्या गायल्या आहेत. अभंग आणि मीराबाईंची भजनेही चांगली गायली आहेस. संतकाव्य गाताना काय करावं लागतं?
लता मंगेशकर-
संतांच्या रचना गाताना मी लता मंगेशकर आहे, हे मी विसरते. मला ज्ञानेश्वर होता येत नाही, पण मी त्यांच्या काव्याशी एकरूप होते. त्यांना ती रचना करताना काय वाटले असेल, याचा विचार करते. तुझ्या चाली हा या गाण्यांतील महत्त्वाचा भाग आहे. त्या चाली काव्याला अनुरूप आहेत. त्यामुळे गायकाला जास्त प्रयत्न करावा लागत नाही.

पं. हृदयनाथ मंगेशकर- अन्य गायकांकडे त्या चाली मला वेगळ्या वाटतात. मीराबाई असंच गायल्या असतील, असं मला वाटतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तुझं व्यक्तिमत्त्व विलीन होतं.
लता मंगेशकर-
यात काव्य ही मोठी गोष्ट आहे. त्यानंतर चाल येते. चालीला वाद्यांची साथ असते. या सगळ्याला आपले समजून आपण गातो, तेव्हा ते गाणं चांगलं होतं. मीरा हा माझा आवडीचा विषय आहे. प्रत्येक गाण्यात मी भान विसरून गायचे. त्या वेळी तर मी खूप आजारी होते. दहा ते बारा दिवस सलग रेकॉर्डिंग झालं. आम्ही दिवसभर काम करायचो. माझा वाढदिवस होता. सप्टेंबर महिना होता. शेवटचं गाणं होतं, 'चालावाही देस...' मला त्या वेळी उभंही राहता येत नव्हतं. पण प्रत्येक गाणं गाताना वाटायचं की आपण मीरेच्या आसपास आहोत. मला खूप आनंद मिळायचा. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ऑपरेशन झालं. त्या वेळी पितृपंधरवडा चालू होता. लोकांना सगळ्यात जास्त ते रेकॉर्ड आवडते. कितीतरी लोकांची पत्रं आली. एवढ्या वर्षांनंतरही लोक ते रेकॉर्ड खूप चांगले असल्याचे सांगतात. तुझ्यासोबत काम करताना चालींचा वेगळेपणा आवडतो. तुझी मला आवडणारी गोष्ट म्हणजे तू निवडलेली काव्यं खूप सुंदर असतात.

पं. हृदयनाथ मंगेशकर- तूच मला कवितेचा नाद लावला. भा. रा. तांबे, मैथिली शरण गुप्ता यांची पुस्तकं आणून दिलीस. पण तुला कवितेचा नाद कसा लागला?
लता मंगेशकर-
वाचनाचा नाद मला कोल्हापूरला अक्कामुळे म्हणजेच इंदिरा या मावसबहिणेमुळे लागला. ती लेखिका होती. ती शरदचंद्र चटर्जी वाचायची. तिने मला पुस्तके आणून दिली. मी मुंबईला आले त्या वेळी विनायकरावांनी हिदी काव्याची पुस्तके दिली. भा. रा. तांबेंचं पुस्तक त्यांनीच मला दिलं. त्यांचं आवडतं गाणं होतं, 'घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ तरी...' ते गाणं त्यांनी मला शिकवलं. 'उठा उठा हो सकळीक' ही चाल त्यांचीच. त्यांनी माझ्यासाठी लेखराज शर्मा म्हणून कवी असलेल्या शिक्षकांची शिकवणी लावली. ते मला हिदी शिकवायला यायचे. त्यांच्यामुळे मी हिदीतील अनेक पुस्तके वाचली. प्रेमचंदांची सर्व पुस्तकं वाचली. त्यांनी मला दिनकर, मैथिली शरण, बच्चन, नरेंद्र शर्मा आदी कवींची पुस्तकं आणून दिली. मास्टर विनायकांमुळे मला काव्याची आवड लागली.

पं. हृदयनाथ मंगेशकर - बाबांना मेकअप, पावडर आवडायचं नाही, पण नंतर तू त्यातच गेलीस...
लता मंगेशकर -
खरंतर मला ते आवडायचं नाही, पण करावं लागलं. नंतर प्लेबॅक सिगिग सुरू केले, तेव्हा मी बाबांच्या फोटोला जाऊन नमस्कार केला आणि सुटले यातून एकदाची म्हणाले... मेकअप, लाईट हे मला कधीच आवडलं नाही. पर्सनल लाईफमध्येही मी ते कधी केलं नाही.

पं. हृदयनाथ मंगेशकर - बाबांच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीत आणि विनायकरावांच्या मृत्यूमुळं तू पार्श्वगायनात आलीस...
लता मंगेशकर -
बाबांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी विनायकरावांचा मृत्यू झाला. १९ ऑगस्ट १९४७ला विनायकराव वारले. त्यानंतर बरोब्बर १०व्या दिवशी मला प्लेबॅक सिगिगचं काम मिळालं. पापा बुलबुले वरती राहायचे. त्यांच्याकडे मोटारसायकल होती. त्यांनी म्युझिक डायरेक्टर हरिश्चंद्र बाली यांच्याकडे मला मोटारसायकलवर बसवून ताडदेवला नेले. त्यांना नवीन सिगर हवा होता. माझं गाणं ऐकून बालींनी मला ३०० रुपये अॅडव्हान्स दिला. या सिनेमातलं एक ड्युएट आणि एक सोलो गाणं एका पठाणानं ऐकून माझ्याविषयी मास्टर गुलाम हैदर यांना जाऊन सांगितलं. त्या वेळी ते 'शहीद' करीत होते. मास्टर गुलाम हैदर पियानो छान वाजवायचे. मला त्यांनी गाऊन दाखवायला सांगितले. मी 'मैं तो ओढू गुलाबी चुनरिया' हे त्यांचेच गाणे गायले. पण मी खूप घाबरले होते. कारण ते खूप मोठे होते. मी 'बुलबुल मत रो यहाँ' हे गाणेही ऐकवले. त्यांनी पुन्हा दुसऱ्या दिवशी बोलावले. ते सकाळी १० पासून संध्याकाळी ५ पर्यंत रेकॉर्डिंग करत होते. आम्ही जेवणा-पाण्यावाचून बाहेर बसलो होतो. त्यानंतर त्यांनी माझं 'बुलबुल मत रो' हे गाणं रेकॉर्ड केले आणि निर्माते एस. मुखर्जींना हे गाणे ऐकवलं. पण मुखर्जींनी ते गाणं नाकारलं. हे गाणं हिरॉईनला मॅच होणार नाही म्हणाले. त्यावर 'तुम चलो मेरे साथ, ये लोग मुझे याद करेंगे की मैने एक आर्टिस्ट को लाया था,' असं म्हणाले. मग प्लॅटफॉर्मवरच आम्ही गाण्याची प्रॅक्टीस केली. त्यांनी मला मालाडला बॉम्बे टॉकीजमध्ये नेले. अक्का आणि मी तिथे गेलो. तिथे 'अब डरने की कोई बात नहीं, अंग्रेजी छोरा चला गया' हे गाणे मी आणि मुकेशकडून गाऊन घेतले. ते खेमचंद प्रकाश यांनी ऐकले आणि मला बोलावले. त्यांनी 'चंदा रे जा रे जा रे' हे 'जिद्दी'मधील गाणे माझ्याकडून गाऊन घेतले. अनिल विश्वासने ते गाणे ऐकले आणि गर्ल्स स्कूल सिनेमाची दोन गाणी माझ्याकडून रेकॉर्ड करून घेतली. एक दिवस मुकेश माझ्याकडे नौशादचा निरोप घेऊन आले. तोपर्यंत श्यामसुंदर यांचे 'बाजार'मधील 'साजन की गलियाँ छोड के...' हे गाणे मी गायले होते. नौशादने ते गाणे ऐकून 'कुछ भी करके लता को लाओ'चा आदेश दिला. मी म्हणाले, मी येणार नाही. सगळेजण नुसतीच ट्रायल घेतात. पण आग्रहामुळे गेले. त्यांनी माझी खूप तारीफ करीत 'साजन की गलियाँ छोड के' गायला लावले. गझल गायला लावली आणि पिक्चर पूर्ण झाला आहे, पण तुझे एक गाणे टाकायचे आहे, असे सांगितले. ते गाणे गुलाम मोहम्मद यांनी रेकॉर्ड केले.

पं. हृदयनाथ मंगेशकर - 'आयेगा आनेवाला' या गाण्याने तुला सगळा हिदुस्थान ओळखू लागला...
लता मंगेशकर -
त्याचे निर्माते बॉम्बे टॉकीज होते. गुलाम हैदर पाकिस्तानला जाणार होते. घाईघाईत आम्ही 'आयेगा आनेवाला' केले.

पं. हृदयनाथ मंगेशकर - मास्टरजी कसे शिकवायचे? त्या गाण्यात अडीच मिनिटे शेअर चालतो, नंतर गाणे सुरू होते, ते कसे शिकवले?
लता मंगेशकर -
खेमचंद प्रकाश स्वत: गायचे. ते राजस्थानी होते. ते मला गाण्यातील प्रत्येक गोष्ट शिकवायचे. स्वत: म्हणून दाखवायचे. सोबत त्यांचे असिस्टंट भोला श्रेष्ठ होते.

पं. हृदयनाथ मंगेशकर - या गाजलेल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकेवर गायकांची नावं नसायची...
लता मंगेशकर -
गायकांची नावे ध्वनिमुद्रिकेवर किवा चित्रपटातही नसायची. त्यासाठी मी संघर्ष केला. मी निर्मात्यांकडे याविषयी तक्रार केली. मी बऱ्याच गोष्टींसाठी भांडणे केली. त्यातील एक म्हणजे, प्लेबॅक सिगरचे नाव पडद्यावर यावे. हे नाव पहिल्यांदा आले, ते राजकुमारच्या 'बरसात'मधून... सगळेच लोक मग ही नावे घालू लागले. प्लेबॅक सिगरला रॉयल्टी मिळावी म्हणून भांडणे केली. त्याचा त्रासही झाला. शेवटी असोसिएशन बंद झाली.

पं. हृदयनाथ मंगेशकर - दीदी, दोन-तीन पिढ्या गाऊन निघून गेल्या. तुझ्या आवाजाची जादू मात्र अजूनही कायम आहे. त्यामागे काय तपश्चर्या आहे?
लता मंगेशकर -
मला गुलाम हैदर यांची सोबत फार थोडी मिळाली. पाकिस्तानला जाताना त्यांनी एक गाणे रेकॉर्ड केले. त्यानंतर एचएमव्हीमध्ये त्यांनी मला अर्धा तास लेक्चर दिले. त्याचा माझ्या गाण्यावर खूप परिणाम झाला. ते मला मेमसाब म्हणत. गाण्याचे बोल काय आहेत, कोणत्या कॅरेक्टरसाठी गायचे आहे, हे समजून घे. विचार करून गा. गाण्यातील प्रसंग दु:खी असेल तर तूही दु:खी होऊन गा, असे ते म्हणाले.

पं. हृदयनाथ मंगेशकर - तुझे बाराही सूर बरोबर जातातच. पण तुझ्या सर्व श्रुत्या फार बरोबर लागतात. त्याचा परिणाम खूप चांगला असतो. वयोमानानुसार आवाजाची जात बदलली तरी ते चांगले वाटते. त्या श्रुत्यांचा अभ्यास तुझ्याकडून कोणी करून घेतला?
लता मंगेशकर -
बाबा आणि देवानं... खूपशा गोष्टी मला नॅचरली मिळाल्या. सूर लागणे ही दैवी देणगी. त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. मी कधीही गाण्यात चूक करत नाही.

पं. हृदयनाथ मंगेशकर - खेमचंद प्रकाश किवा अलीकडे ए. आर. रेहमानपर्यंत तू गायलीस. आज काळ बदलला आहे. तू ६२ ला 'ऐ मेरे वतन के लोगो' गायलीस आणि पंडित नेहरूंच्या डोळ्यांत पाणी आले. आपण चीनसोबतच्या युद्धात हरलो होतो, त्याबद्दल सांग...
लता मंगेशकर -
पंडितजी त्या वेळी अतिशय दु:खी होते. मी थोडी आजारी होते. त्यामुळे हे गाणे मी आणि आशा करते, असे प्रदीपजींनी सांगितले. त्याप्रमाणे आशा गेली. तिने एक रिहर्सल केली. पण नंतर काय झाले ते माहीत नाही. पण तिने येऊन सांगितले की, मी दिल्लीला येणार नाही. तिला हेमंतकुमारांनी सांगितले, 'तुम नहीं जाओगी तो अच्छा नहीं लगेगा. पुरी इंडस्ट्री जा रही हैं. देश की हालत अच्छी नहीं.' पण ती म्हणाली, 'मैं बाद में जाऊंगी, अभी नहीं.' ते गाणे अर्धवट झाले. सी. रामचंद्रांनी ते गाणं माझ्याकडे एका टेपवर पाठवून दिलं. मी दिल्लीला चार दिवस आधी जातोय. तू हे गाणं पाठ करून गा, असा निरोप पाठवला. मी घाबरले. यात जर चूक झाली तर काय करणार? मी आजारी असताना निघाले. माझी मैत्रीण नलू आणि मी ती टेप प्रवासात ऐकली. हॉटेलवर उतरल्यावर टेप लावली आणि सगळं गाणं पाठ केलं. दुसऱ्या दिवशी २७ जानेवारीला शो होतो. मी कुठल्याही म्युझिक डायरेक्टरसोबत गाणार नाही. माझ्या म्युझिक डायरेक्टरसोबत 'अल्ला तेरो नाम' आणि 'ए मेरे वतन के लोगो' गाते म्हणाले.
'ए मेरे वतन'साठी सी. रामचंद्र होते. पण 'अल्ला तेरो नाम' मीच गायले. ए मेरे वतन के लोगो लोकांना खूप आवडले. गाणं एकून पंडितजी रडतील, इंदिराजींच्या डोळ्यांत पाणी येईल, असे मला वाटले नव्हते. मी गायले आणि आत आले. एक कप कॉफी मागितली. स्टेजवर सुमन कल्याणपूरकर गात होती. तसेच मेहबूबसाहेब मला विचारत आले. त्यांचे आणि पंडित नेहरूंचे संबंध चांगले होते. पंडितजींनी मला बोलवल्याचा निरोप त्यांनी आणला आणि मला त्यांच्याकडे घेऊन गेले. मी गेल्यावर पंडितजी, इंदिराजी आणि राधाकृष्ण उभे राहिले. पंडितजी म्हणाले, 'आज तुमने मुझे रुला दिया...'

पं. हृदयनाथ मंगेशकर - हे गाणे गाताना तुझ्या मनावर काही परिणाम होत होता का? कारण त्या वेळी वातावरण तसे होते...
लता मंगेशकर -
नाही. पण ते गाणे इफेक्टिव्ह होते, हे मला माहिती होते. मला ते गाणे आवडले आणि ते मी मन:पूर्वक गायले एवढेच. कुठलेही गाणे मी मनापासूनच गाते. उडवाउडवी करत नाही. नंतर ते किती चांगले होते, ते ऐकणाऱ्यांनाच माहिती.

पं. हृदयनाथ मंगेशकर - तू सध्याचे संगीतकार, गायक यांना काय सांगू इच्छिते?
लता मंगेशकर -
आता काळासोबत सगळेच बदलले आहे. आजच्या १० पिक्चरमधला मुश्कीलीने एखादा बरा वाटतो. इंडस्ट्रीत पूर्वी म्युझिकला प्राधान्य होते. 'मुगले आजम'मध्ये १२ गाणी होती. पिक्चर चालला नाही, तरी गाणी चालायची. आता पिक्चरमध्ये आयटम साँग आली. त्यात नुसता डान्स असतो. ड्युएट गाणी असतात. सोलो गाणी जास्त करून मुलांची असतात. आता म्युझिकला महत्त्वच देत नाहीत. दोन-तीन गाण्यांतच पिक्चर संपतो. संगीत करणाऱ्यांना पूर्वीप्रमाणे संधी राहिलेली नाही. काही प्रोड्युसर तर एका पिक्चरसाठी पाच-पाच संगीतकार ट्राय करतात. सिगर आणि संगीतकारांना आता मान राहिलेला नाही. कवी तर नाहीतच. तू नाव घे, तीनच नावे येतात. गुलजार, जावेद अख्तर, प्रसून जोशी. त्या वेळी जेवढे संगीतकार तेवढे कवी होते आणि ते अतिशय चांगले होते.

पं. हृदयनाथ मंगेशकर - अभिरुची अशी खाली आणण्याचा दोष प्रेक्षकांचा की निर्मात्यांचा?
लता मंगेशकर -
अभिरुची खाली करण्याचे काम तुमचेच. तुम्ही जे पिक्चर देता, ते बघून प्रेक्षकांना आयटम साँग, डान्स, छोटे कपडे घालून आलेल्या मुली आवडतात. सध्या तर टीव्हीवर घाणेरड्या, न बघवणाऱ्या जाहिराती लागतात. त्या लहान मुले बघतात. त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो.

पं. हृदयनाथ मंगेशकर - तू वाढदिवसाच्या निमित्ताने या संगीतकारांना काय सांगू इच्छिते?
लता मंगेशकर -
मी सर्व गायक आणि गायिकांना सांगू इच्छिते की, गाण्यातील प्रत्येक गोष्ट, म्हणजे काव्य, चाल, कोणासाठी गाताय, गाणे काय आहे हे सगळे विचारात घेऊन गावे. लता, आशा, रफिक, किशोरकुमार यांना गाणी मिळत गेली. आज नवीन लोकांना गाणीच मिळत नाहीत. त्यांना सलील चौधरी, मदनमोहन, सचिनदेव बर्मन, आर.डी. बर्मन असे संगीतकार मिळत नाहीत. आणखीही एक गोष्ट आहे. जतीन-ललित हे बंधू चांगले संगीतकार होते, पण ते विलग झाले. हल्ली प्रत्येक गोष्टीत असे होत आहे.
शेवटी प्रेक्षकांना एवढेच सांगेन की, त्यांना गेली ६० वर्षे माझं गाणं आवडलं. त्यांनी मला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्यात. शेवटपर्यंत हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू द्यावेत...

No comments:

Post a Comment