'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Thursday, 19 January 2012

त्रिमूर्ती भंजन (भाग- १)

भाग ५ :  त्रिमूर्ती भंजन (भाग- १)
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानं मराठी माणसांना डोंगराएवढे नेते दिले. या लढ्यात आणि त्यानंतरही मराठी माणसांना आधार देणारे हे नेते म्हणजे, समाजवादी पक्षाचे  एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, झुंजार पत्रकार आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, आणि नंतरच्या काळात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस. 
मराठी माणसांची नस गवसलेले हे नेते नंतरही आपापला प्रभाव टिकवण्यासाठी प्रयत्नशील होतेच. यात सरशी झाली ती प्रबोधनकार ठाकरेंची. त्यांचे पुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे कुंचल्याची तलवार घेऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी होते. 

मराठी माणसाला मुंबई मिळाली. पण या उद्योगनगरीत मराठी माणूस मात्र उपराच राहिला. त्याला न्याय मिळावा, स्वत:चा आवाज मिळावा म्हणून ठाकरे बंधूंनी साप्ताहिक मार्मिक सुरू केलं. त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळं ठाकरे उपरोक्त नेत्यांचे थेट स्पर्धकच बनले. १९६६ ला शिवसेना स्थापन झाल्यानंतर तर या स्पर्धेला चांगलीच धार चढली. 

मराठी माणसाच्या हृदयसिंहासनावर राज्य करायचं असेल तर या नेत्यांना वाटेतून दूर करायला लागणार, हे ठाकरेंच्या लक्षात आलं. पहिला नंबर होता, आचार्य अत्रेंचा. खरं तर अत्रे हे प्रबोधनकार ठाकरेंचे जीवलग मित्र. पुण्यात सत्यशोधक चळवळीत एकत्र आलेले हे समाजधुरीण नंतरही साहित्य, सिनेमा आदी क्षेत्रांमध्येही एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन कार्यरत होते. 
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात तर त्यांनी भीमपराक्रम केला होता. पण नंतर अत्रे आणि ठाकरे यांच्यात वाद उभा राहिला. यामागचं कारण सांगितलं जातं ते अत्र्यांची डाव्यांशी असलेली मैत्री. मग या मुलुखमैदान तोफा समोरासमोर येऊन एकमेकांवर आग ओकू लागल्या. मार्मिक आणि मराठामधून परस्परांवर शेलकी विशेषणं उधळली जाऊ लागली. सुव्वराचार्य, प्रल्हादखान, वरळीचा डुक्कर अशा विशेषणांनी अत्र्यांचा मार्मिकमधून उद्धार केला जाऊ लागला. डांगेंसोबत राहतात म्हणून त्यांनालालभाई असंही हिणवण्यात येऊ लागलं.

अत्र्यांनी तर ठाकरेंविरुद्धच्या  सांज मराठातील लेखांची एक पुस्तिकाच तयार केली. तिचं नाव होतं,कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कारटी. आणि तिची किंमत ठेवण्यात आली होती, एक कवडी!
नंतर मात्र अत्रेंच्या विरोधात शिवसेनेनं कंबर कसली. १९६७मध्ये शिवसैनिकांनी अत्र्यांचीठाण्यातली सभा उधळली. अत्र्यांवर जोडे फेकले. गदारोळात अत्र्यांना मारही बसला. त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली. त्या काळात अत्र्यांचा महाराष्ट्रात प्रचंड दबदबा होता. पण या दिवशी शिवसैनिकांनी अत्रेंच्या व्यक्तिमत्वातली हवाच काढून घेतली. या लोकसभा निवडणुकीत अत्र्यांचा पराभव झाला. अर्थात या पराभवात शिवसैनिकांचा मोठा वाटा होता.

असं सांगितलं जातं की, सुरुवातीला अत्र्यांनाच मार्मिकचं संपादक करण्याचा ठाकरेंचा विचार होता. तसंच शिवसेनचं मुख्य पदही त्यांना देण्याचा विचार होता. मात्र अत्रे काही शिवसेनेच्या व्यासपीठावर आले नाहीत. पण शिवसेनाप्रमुखांवर अत्र्यांच्याच लेखणी आणि वाणीचा प्रभाव असल्याचं मराठी माणसाला सतत जाणवत राहिलं.
अत्र्यांची जादू तर शिवसेनेनं निष्प्रभ केली. आता उरले होते, मुंबईतील कामगारांवर पर्यायानं मराठी माणसांवर अधिराज्य गाजवणारे नेते, कॉम्रेड डांगे आणि जॉर्ज फर्नांडिस. त्यांच्याविषयी उद्याच्या भागात.
'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/20/33786

Wednesday, 18 January 2012

मराठीचा झेंडा

भाग ४ : मराठीचा झेंडा
 साठच्या दशकात महाराष्ट्रभर संयुक्त महाराष्ट्राचा वणवा उसळला. म्हणजे प्रकार असा झाला की,भाषिक राज्य संकल्पनेनुसार बहुतेक राज्यं स्वतंत्र झाली. पण महाराष्ट्राला स्वतंत्र दर्जा द्यायला काही केंद्रसरकार तयार होईना. 
त्यामागचं कारण म्हणजे मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी अर्थात उद्योग नगरी. ती ताब्यात राहावी. शिवाय मराठी माणसाविषयी केंद्राला आकस असल्याचा आरोप अर्थमंत्री चिंतामण देशमुखांनी तर अगदी जाहीरपणे केला होता.
केंद्राच्या या धोरणाविरोधात मराठी माणूस जागा झाला. झाडून सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी  संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. लढाईचं मैदान होतं मुंबई. आणि सैनिक होता, गिरणगावातला मराठी गिरणीकामगार. या वीरांनी आणि सा-या महाराष्ट्रानं रणात बाजी लावली. अखेर दिल्लीला झुकावं लागलं. १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.

त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. मात्र संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या निमित्तानं जागृत झालेली मराठी शक्ती कायम जागती राहावी असं अनेकांना वाटत होतं. त्यात आघाडीवर होते आचार्य अत्रे. या लढ्यानंतरही लोंबकळत पडलेला मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा सीमाप्रश्न सुटावा, मराठी माणसांची एकी राहावी यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

त्यानंतर मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी रामराव आदिकांनी १ ऑगस्ट १९६५मध्ये लालबाग-परळ भागात ‘महाराष्ट्र हितवर्धिनी’ नावाची संस्था स्थापन केली. नोक-या तसंच सरकारी वसाहतींमध्ये मराठी माणसाला ८० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत, परप्रांतीयांचं वर्चस्व वाढू नये,अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. 

शिवसेना नेते दत्ताजी नलावडेही त्यावेळी आदिकांसोबत होते. बाळासाहेबांचे तर ते मित्रच होते. त्यांच्या कामाचं कौतुक बाळासाहेब अगदी जाहीरपणे करीत असत.
दुसरीकडं पत्रकार म्हणून 'लोकसत्ता'चे ह. रा. महाजनीही मराठीपणाचा जोरदार पुरस्कार करत होते. 

मात्र या सगळ्यांमध्ये उजवे ठरले ते ठाकरे पितापुत्र. त्यांनी मराठी माणसांची लढाऊ संघटना उभारण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. प्रबोधनकारांनी तर ४०च्या दशकातच शुद्ध महाराष्ट्रीय पक्ष स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. प्रबोधनकारांचे सुपुत्र बाळ ठाकरे मावळा नावानं व्यंगचित्रं काढून महाराष्ट्रविरोधकांना फटकारे मारत होते. 

नाही म्हणता शिवसेना या मराठी माणसांच्या संघटनेची कल्पना अत्र्यांनीही मांडली होती. पण त्याला मूर्त दिलं ठाकरेंनी. मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी मार्मिक साप्ताहिक काढलं. महत्त्वाच्या ठिकाणी मराठी माणसांना डावलून दाक्षिणात्य कसे जागा बळकावून बसले आहेत, हे मार्मिकमध्ये पुराव्यानिशी छापून येऊ लागलं.
मार्मिकच्या ऑफिसमध्ये बेरोजगार तरुणांची गर्दी वाढू लागली. या गर्दीला एक दिशा दे असं प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना सुचवलं. आणि स्थापन झाली शिवसेना! तारीख होती, १९ जून १९६६.

मराठीचा झेंडा फडकावण्यात शिवसेना यशस्वी झाली. आता शिवसेनेचं ध्येय बनलं, फक्त मराठी आणि मराठी!
मराठी मनांवर अधिराज्य गाजवेल ती फक्त शिवसेना. त्यात इतर कोणाचीही लुडबूड नको, असा निश्चय झाला. मग जानी दोस्त जॉर्ज फर्नांडिस असोत, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात खांद्याला खांदा देऊन लढणारे आचार्य अत्रे असोत वा कॉम्रेड डांगे. त्यांना नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला गेला. त्याविषयी उद्याच्या भागात. 

'नवशक्ति'तील लिंक - 'http://61.8.136.4/nav/2012/01/19/33456 

Tuesday, 17 January 2012

तळपती तलवार


भाग ३ :  तळपती तलवार
कामगार आहे मीतळपती तलवार आहे..’, नारायण सुर्वेंनी केलेलं हे गिरणगावातल्या कामगाराचं वर्णन. इतिहास घडवणा-या कामगारांच्या वर्णनासाठी यापेक्षा समर्पक शब्द असूच शकत नाहीत.
आयुष्याशी झगडताना या कामगारांच्या जगण्याला लखलखीत धार आली होती. कामगार म्हटलं की संघर्ष आलाच. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कामगारांनी संप करायचा आणि मालकांनी तो मोडण्याचा प्रयत्न करायचा. हे अगदी १८४४मध्ये मुंबईत पहिली गिरणी सुरू झाल्यापासून चालू आहे.

सत्यशोधक नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरणगावात पहिली कामगार संघटना उभी केली. ते महात्मा जोतिराव फुल्यांचे कट्टर अनुयायी होते. त्यांनीच इथल्या कामगारांना लढायला शिकवलं. प्रसंगी लोकमान्य टिळकांशीही पंगा घ्यायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही.

अर्थात १९०८ मध्ये टिळकांना सहा वर्षांची शिक्षा होताच गिरणगावातल्या कामगारांनी अभूतपूर्व सार्वत्रिक बंद पाळला. तोही रोजंदारी बुडवून. अगदी कम्युनिस्ट नेता लेनिननंही याची दखल घेतली. अर्थात संपांची सुरुवात १८९०पासूनच झाली होती. १९२०मध्ये या संपांनी कळस गाठला आणि त्याचवेळी कामगार संघटना पूर्णपणे कम्युनिस्टांच्या ताब्यात गेल्या. 
केवळ स्वत:च्या मागण्यांसाठीच नव्हे, तर समाजाचंही आपण देणं लागतो या भूमिकेतून कामगार अनेक सामाजिक लढ्यांमध्येस्वातंत्र्यलढ्यांमध्ये सहभागी झाले. आघाडीवर राहून लढले.
  
१९४२चं चलेजाव असो, १९४६चं नावीक बंड असोसंयुक्त महाराष्ट्राचा लढा असो की गोवा मुक्ती आंदोलन. गिरणगावानं तो अटीतटीनं लढवला. ४२च्या आंदोलनाचा भडका देशभर उडालेला असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं मात्र लोकविरोधी भूमिका घेतली. अशावेळी गिरणीकामगारांनी आपला विवेक शाबूत ठेवून या लढ्यात उडी घेतली.

स्वातंत्र्यसंग्रामातही गिरणगावानं झोकून दिलं होतं. १९३०मध्ये पुणे जिल्ह्यातल्या महाळुंगे पडवळ गावच्या तरुण गिरणी कामगारानं परदेशी माल घेऊन जाणा-या ट्रकखाली स्वत:ला झोकून दिलं.

नाविक बंडात परळच्या एलफिन्स्टन पुलावर इंग्रज सैनिकांच्या गोळीबारात अनेक कामगार कार्यकर्ते ठार झाले. या लढ्यामुळं कम्युनिस्ट पक्षाला पुन्हा एकदा बळ मिळालं.
सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेलाही याच गिरणगावानं मदत केली. भाजीच्या पिशवीत बॉम्ब नेण्यापासून ते रेल्वेरुळांमध्ये स्फोटकं ठेवण्याचं काम इथल्या धाडसी तरुणांनी केलं.
  
संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर ख-या अर्थानं गिरणगावानंच लढवला, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या १०५ हुतात्म्यांपैकी तब्बल २२जण गिरणगावातले कामगार होते. शाहीर अमरशेख किंवा अण्णाभाऊ साठेंचा एखादा पोवाडा ऐकला, वाचला तरी गिरणी कामगारांच्या लढ्याची प्रखरता आपल्याला दिपवून टाकते. जागा मराठा आम, जमाना बदलेगा या अमरशेखांच्या ललकारीनं महाराष्ट्राला विरोध करणा-या दिल्लीतल्या काँग्रेस सरकारला घाम फुटला होता. तर गावोगाव फिरत, लोकनाट्यातून, पोवाड्यातून
‘‘एकजुटीच्या या रथावरती । आरुढ होवून चल बा पुढती ।
नवमहाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रकट निज धाव ।’’… अशा ललकारीनं अण्णाभाऊ महाराष्ट्राचं मन चेतवत होते. 

संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला. उरलेला सीमाभाग महाराष्ट्रात यावा म्हणून मग संपूर्ण महाराष्ट्र समिती अस्तित्वात आली, पण नंतर तीही नामशेष झाली. मराठी अस्मितेची धग मात्र कायम राहिली. गिरणगावातल्या कामगारांच्या रुपानं तळपत असलेली मराठी स्वाभीमानाची ही तलवार हस्तगत करण्यासाठी मग शिवसेनेनं कंबर कसली. आणि टार्गेट ठरलं, गिरणगावातले कम्युनिस्ट ! 

'नवशक्ति'तील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/18/33366 

Monday, 16 January 2012

रणभूमी गिरणगाव


भाग २ : रणभूमी गिरणगाव
महानगरी मुंबई पोर्तुगिजांच्या ताब्यात होती.. त्यांनी ती आपल्या ब्रिटीश जावयाला आंदण दिली..हीच मुंबापुरी इंग्लडच्या राजानं दहा पौंड भाड्यानं ईस्ट इंडिया कंपनीला दिली...हा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे. पण पुढं ही उद्योगनगरी घडवली कोणी याबाबत कवी नारायण सुर्वे गर्जून सांगतात,
‘‘तोच मीतेच आम्ही ह्या तुझ्या वास्तूशिल्पाचे शिल्पकार,
तुझ्या सौंदर्यात हे नगरीदिसोंदीस घालीत असतो भर...’’

तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात,
‘‘बा कामगारा तुजठायी अपार शक्ती।
ही नांदे मुंबई तव तळहातावरती।।...’’
अण्णाभाऊंच्या पोवाड्यातला हा कामगार म्हणजे गिरणगावातला गिरणीकामगार. तो आला महाराष्ट्रभरातून. सुरुवातीला आली कोकणी माणसं. कारण भाऊच्या धक्क्यावरून समुद्रमार्गे कोकणात ये-जा करण्याची त्यांची सोय होती. नंतर मुंबई-पुण्याहून मिरज-कोल्हापूरला जाणारा रेल्वेमार्ग सुरु झाला, तशी घाटावरची माणसं गिरणगावात येऊ लागली.

मुंबईच्या मध्यभागी असलेलं गिरणगाव म्हणजेधुराड्यांनी व्यापलेलं आकाशदाटीवाटीनं उभ्या असलेल्या लाल कौलारू चाळीत्याशेजारी अहोरात्र सुरू असणा-या गिरणी. गिरणगाव म्हणजे जवळपास ६०० एकरावरच्या ५८ गिरण्या आणि पंधराशे एकरांवरचा कामगारांचा परिसर. ढोबळ नकाशा सांगायचा म्हटला तर मुंबईतल्या भायखळ्यापासून दादरपर्यंत आणि महालक्ष्मीपासून एल्फिन्स्टन रोडपर्यंत पसरलेला भाग म्हणजे गिरणगाव.

गिरणगावातले बसचे प्रमुख स्टॉप म्हणजेमहालक्ष्मीतील संत गाडगेबाबा चौकगुलाबराव गणाचार्य चौकखालचे परळप्रभादेवीप्रबोधनकार ठाकरेचौक, नायगावशिवडीघोडपदेवमाझघावभायखळा.

रेल्वे स्टेशन्स सांगायची तर भायखळाचिंचपोकळीकरीरोडपरळ आणि दादर. लट दिशेने दुस-या रेल्वेमार्गाने दादरएल्फिस्टन रोडलोअर परळ आणि महालक्ष्मी. हार्बर मार्गावरचं कॉटनग्रीनरे रोड,शिवडी. तर लखमसी नप्पू मार्गपश्चिमेला सेनापती बापट मार्ग आणि ना. म. जोशी मार्ग, डॉ.आंबेडकर मार्ग आणि पूर्वेकडचा रफी अहमद किडवाई मार्ग हे प्रमुख रस्ते.

याबरोबरच नरे पार्कातलं गणेश गल्ली मैदानकामगार मैदानत्याच्या पलिकडं गिरणगावात न मोडणारी गिरगावची चौपाटीदादरचं शिवाजी पार्क मैदानप्रभादेवीचं नर्दुल्ला टँक मैदान ही गिरणगावाशी संबंधित महत्त्वाची ठिकाणं. याशिवाय कम्युनिस्टांची ऑफिसं असणारी परळमधली दळवी बिल्डिंग, खेतवाडीतलं राजभवनलालबागेतलं तेजुकाया मॅन्शनतसंच करीरोड पुलाजवळची हाजीकासम,प्रभादेवीची ‘वाकडी’, आग्रीपाड्याच्या बीआयटी चाळीकामाठीपु-यातल्या बटाट्याची चाळी यांच्याशिवाय गिरणगावाचा उल्लेख पूर्ण होणार नाही.

शहरातल्या याच भूभागानं, गिरणगावानं मुंबईचं आणि संपूर्ण देशाचं औद्योगिक जीवन घडविलं. आणि ते घडवण्यासाठी राबणारे हात होते, मराठी माणसाचे. जवळपास ८० टक्के म्हणजेच सुमारे अडीच लाख मराठी माणसं गिरणगावात राहत होती. त्यामुळं साहजिकच या एकगठ्ठा समाजावर राजकीय पक्ष डोळा ठेवून होते. 

पण हा मराठी गिरणी कामगार होता, कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य, कार्यकर्ता. कारण हाच पक्ष कामाच्या ठिकाणी अर्थात गिरणीत त्यांचा पाठीराखा होता. अर्थात या कामगारांचा लढाऊ बाणा कम्युनिस्टांच्या नेहमीच उपयोगी आला. पण १९६६मध्ये मराठीचा जयजयकार करत शिवसेनेचा उदय झाला आणि हा कामगार वर्ग शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली जमू लागला. 
साहजिकच अस्तित्वाच्या लढाईसाठी तलवारी उपसल्या गेल्या. अर्थात या लढाईतला सैनिक होता, सर्वसामान्य मराठी गिरणी कामगार. त्याच्या लढाऊ बाण्याविषयी बोलूयात पुढच्या भागात.

'नवशक्ति'मधील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/17/33081

१९६८ची निवडणूक

कासराभर उडी मारल्यानंतर सिंह मागे वळून पाहतो. आपण किती लांब उडी मारली ते. मग अदमास घेत पुढची उडी घेतो. आपण त्याला 'सिंहावलोकन' म्हणतो. माणसानंही असंच करावं. इतिहासाचा मागोवा घ्यावा. म्हणजे आजूबाजूच्या घडामोडी उलगडतात. भविष्यात काय होईल याचा अंदाज येतो, असं जुने-जाणते सांगतात. 
ताजा संदर्भ आहे, मुंबई महापालिका निवडणुकीचा. १९६८ सालच्या निवडणुकीनं पुढचा सारा राजकीय पटच बदलून टाकला. या निवडणुकीविषयी, त्यावेळच्या वातावरणाविषयी 'नवशक्ति'त सुरू केलेला हा कॉलम. अर्थात आयडिया आहे, संपादक सचिन परब यांची. मी फक्त भारवाही हमाल...



भाग १ : इलेक्शन दे धक्का !
केवळ एका महापालिकेच्या निवडणुकीमुळं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं राजकारण बदलून गेलं...हे कोणालाही खरं वाटेल काय? पण होय, हे खरं आहे. भारतीय राजकारणात अशी उलथापालथ झाली ती मुंबई महापालिकेच्या १९६८ सालच्या निवडणुकीत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या मुंबईतल्या दादा राष्ट्रीय पक्षाचं यात पानिपत झालं. त्यांच्यावर दे धक्का विजय मिळवला तो नव्यानंच उदयाला आलेल्या प्रादेशिक पक्षानं. त्याचं नाव, शिवसेना!

मुंबईतल्या या निवडणुकीपासून कम्युनिस्ट पक्षाला मुंबईत तर ओहोटी लागलीच. पण या पराभवाचा परिणाम देशभर झाला. देशातल्या पुढच्या दोन निवडणुका इंदिरा गांधींच्या वर्चस्वाखाली झाल्या. कम्युनिस्ट पक्षाची लोकसभा, विधानसभेतली सदस्यसंख्या कमी झाली. 
डाव्यांच्या पाठीशी असलेला वर्ग काँग्रेसकडे वळला. यात प्रामुख्यानं होते, कामगार, शेतकरी आणि मध्यमवर्ग. इंदिराबाईंच्या घोषणा त्यांचं आकर्षण ठरलं. या घोषणा होत्या, बँक राष्ट्रीयीकरण, राजेरजवाड्यांचे तनखे रद्द, बंद पडलेल्या किंवा आजारी गिरण्याचं राष्ट्रीयीकरण आणि गरीबी हटाव इत्यादी. 
७२ला इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षानं या आणिबाणीचं समर्थन केलं. आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पक्षानं सपाटून मार खाल्ला. आणिबाणीनंतर कम्युनिस्टांकडून काँग्रेसकडं गेलेला वर्ग जनता पक्षाकडं गेला.

आणिबाणीवरून कम्युनिस्ट पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले. त्यात पक्ष पुन्हा एकदा दुभंगला. कॉम्रेड डांगेंसारख्या उत्तुंग नेत्याला पक्षाबाहेर काढण्यात आलं. आणि मग काँग्रेसविरोध हाच कम्युनिस्ट पक्षाचा एककलमी कार्यक्रम सुरू झाला. त्याचा एकूण परिणाम म्हणजे पक्ष छोटा छोटा होत गेला. आणि तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दावणीला बांधला गेला.
याच काळात प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं. या प्रादेशिक अस्मितेला चालना मिळाली ती शिवसेनेमुळे. शिवसेना म्हणजे या पक्षांपुढं एक आदर्श’ ठरला. प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा घेऊन एखादा पक्ष एवढी परिणामकारक मुसंडी मारू शकतो, याचा साक्षात्कार शिवसेनेच्या १९६८मधील विजयातून देशातल्या इतर राज्यांना झाला. 
त्यातूनच मग तामीळनाडूत अण्णा डीएमके, आंध्र प्रदेशात एन. टी. रामाराव, उत्तरप्रदेशात मुलायम सिंग, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, ओरिसात बिजू पटनायकांचा जनता दल, पंजाबमध्ये अकाली दल, ओमप्रकाश चौटालांचा हरियाणा जनतादल हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष उदयाला आले. या सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाले.

१९६६ सालच्या शिवसेनेच्या स्थापनेनंतर १९६७ सालीच काँग्रेसला देशभर प्रादेशिक अस्मितेचा पहिला धक्का बसला. ९ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता गेली. कम्युनिस्टांसारख्या राष्ट्रीय पक्षाला आपण त्यांच्या बालेकिल्ल्यातच, मुंबईत हरवू शकतो हा या निवडणुकीतून शिवसेनेला आला.

१९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकांवर आणि मुंबईतल्या गिरणगावावर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्ट पक्षाला मोठा धक्का बसला. कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळला. काँग्रेसमध्ये शिवसेनेचा वटवाढला. १९६८चं हे महाभारत नेमकं जिथं घडलं त्या रणभूमीची, गिरणगावाची आणि त्याच्या इतिहास-भूगोलाची चर्चा करूयात उद्याच्या भागात. 


'नवशक्ति'मधील लिंक - http://61.8.136.4/nav/2012/01/16/32692