'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 28 August 2011

सिर्फ आधी जित हुई है...


चिल्यापिल्यांच्या हातून ज्यूस पित अण्णा उपोषण सोडताहेत. सर्व चॅनेल्सवर फक्त आणि फक्त अण्णाच आहेत. बाहेर पावसाची संततधार सुरू आहे. सुटीचा दिवस आहे. सगळेजण टीव्हीला खिळून आहेत.
गेले १३ दिवस २४ तास लाईव्ह दिसणा-या अण्णांचा मी सारखा विचार करतो आहे. उसळणारा जनसागर पाहून त्यांच्या उत्साहानं धावत सुटण्याचा..त्यांच्या हसण्याचा.. त्यांच्या तालावर टाळ्या वाजवण्याचा.. त्यांच्या भाषणांचा.. त्यांच्या घोषणांचा..त्यांच्या बसण्याचा.. कूस बदलून झोपण्याचा..त्यांच्या गर्दीत हरवलेल्या नजरेचा..त्यांच्या उपोषणाचा.
त्यांची ती शुभ्र कपडे, ती टोपी, ते धोतर, ती कोपरी. सरकारकडून निराशाजनक बातमी आल्यावर नेटानं उठून उभं राहणं. हात उंचावणं. चेह-यावर अधिकाधिक निग्रह येणं.
चहा पिता पिता आम्ही कॉमेंट पास करत असतो.
‘‘अण्णांची लॉटरी लागली यार!
अण्णा काय झकास हिंदी बोलायला लागलेत नाही?
कपडे बाकी कडक इस्त्रीचे आहेत हां अण्णांचे.
स्टेजमागं जाऊन खात असणार अण्णा काही तरी.
अण्णा त्या सीव्हिल सोसायटीच्या हातातलं बाहुलं आहेत.
अण्णा फक्त मेणबत्तीवाल्यांचं प्रतिनिधित्व करतायत.
अण्णांचे जुने साथीदार कुठे गेले रे?
अण्णा पक्का नगरीआहे. भल्याभल्यांना गुंडाळून ठेवलं राव त्यानं.
त्यांचा आता त्यांच्या टीमवर विश्वास राहिलेला नाही.
अण्णा आपले निश्चयी चेह-यानं स्टेजवर बसून असतात. गर्दीकडं बघत.
परवा संसदेत लालूजी भाषण करताना म्हणाले, जुनी माणसं आहेत बाबांनो ही. उपासतापासाची सवय असते त्यांना. हटायची नाहीत. कालच्या भाषणातही तेच म्हणाले. पण अण्णांच्या उपासाबाबत त्यांनाही शंका वाटलीच.
अण्णा खरंच एवढे दिवस उपाशी कसे राहिले? आमच्याकडं एक जुने चळवळीतले कार्यकर्ते आले होते. त्यांना विचारलं, खरंच भूक कशी काय सहन होत असेल हो, एवढे दिवस? तर ते म्हणाले, मीही केलं होतं सहा दिवस उपोषण. पहिल्या दिवशी फार भूक लागते. पण दुस-या दिवशी डोकं जाम दुखायला लागतं. मग नंतर भूक कमी होते. शेवटी मनाच्या निग्रहावर अवलंबून आहे हो.
भुकेची जाणीव होऊन मी समोरच्या बशीतलं आणखी एक बिस्कीट उचलतो.
गाडी पुन्हा अण्णांच्या सहका-यांवर घसरते. रोज सिनेमास्टाईल झेंडा फडकवण्याशिवाय त्या किरण बेदींना काही कामच नाही. तिनं आणि त्या केजरीवालांनी अण्णांचं आंदोलन हायजॅक केलंय. हे लोक राळेगणच्या लोकांनाही अण्णांना भेटू देत नाहीत. आपले बाळासाहेब भारीच बोलले. त्या टीमला बसवा म्हणाले उपोषणाला. हा हा हा.
सरकार म्हणतं, त्यांचाही या लोकांवर विश्वास नाही. आम्ही थेट अण्णांशीच बोलू.
असंख्य बूमच्या गर्दीनं घेरलेले केजरीवाल बोलत असतात. बोलत असतात. गळ्याच्या शिरा तटतटलेल्या. चेह-यावरून घाम निथळतोय. डोळ्याभोवती काळी वर्तुळं जमलीत. सततच्या धावपळीनं वजन घटलंय. कपडे अधिकच ढगळ होत चाललेत.
म्हणतायत, आम्ही घटनाविरोधी नाही आहोत. आम्ही निवडणूक लढवणार नाही आहोत.
आता अण्णा राजघाटाकडं निघालेत. बापूजींच्या दर्शनाला. वारकरी नाही का, एकादशीनंतरची बारस सोडण्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाला जात.
तीन दिवसांनी अण्णा राळेगण सिद्धीला जातील. तिथं गावकरी त्यांचं जंगी स्वागत करतील. मिरवणूक काढतील. दमलेभागलेले अण्णा रात्री उशिरा आपल्या मुक्कामी जातील. यादवबाबांच्या मंदिरात. समाधीपुढं हात जोडतील. मग डोक्यावरची गांधी टोपी काढून तिची व्यवस्थित घडी घालतील. नैतिकता जपणा-यालाच ही टोपी घालायचा अधिकार आहे, असं आपण भाषणात म्हणाल्याचं त्यांना आठवेल. त्यावर ते स्वत:शीच समाधानानं हसतील. आणि शिणलेल्या डोळ्यांनी झोपेच्या आधीन होतील.
त्या रात्री हार घालावा असा गळा आणि आणि धरावेत असे पाय आपल्याच नगर जिल्ह्यात असल्याचा साक्षात्कार वात्रटिकाकार फुटाण्यांना झालेला असेल.
पहाटेच अण्णांना उठवायला त्यांच्या नापासांच्या शाळेतली मुलं येतील. त्यांच्यासोबत अण्णा जॉगिंग करत टेकडीवर जातील. वर पोहोचल्यावर एक दीर्घ श्वास घेतील न् म्हणतील, हां आता काय बरं वाटतंय म्हणता..मग हात उंचावून मोठ्यानं म्हणतील, अभी सिर्फ आधी जित हुई है...आधी. लडाई अभी बाकी है...

1 comment: