'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Sunday 21 August 2011

अब बुढ्ढा नही हटेगा



काँग्रेसचे प्रवक्ते खिल्ली उडवत होते, तेव्हा अण्णा राजघाटावर गांधींजींच्या समाधीसमोर ध्यान लावून बसले होते. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ. निश्चल. निग्रही.
म्हटलं, अब बुढ्ढा हटेगा नही भाई...

मित्र म्हणाले, ‘‘म्हातारा भारीचै राव. प्राणायाम शिकवणा-या रामदेवबाबांची पाच दिवसांत हालत पतली झाली. ह्यानं तर सरकारचीच कढी पातळ केली. कुठल्या गिरणीचं पीठ खात असेल कोणास ठाऊक?’’
म्हटलं, महाराज, हा वारकरी आहे, आळंदी पंढरीचा. निर्जळी एकादशी करणारा. माऊलींची वारी करणारा. उपवासाचं काय घेऊन बसलात? या माळक-यानं केव्हाच तुळशीपत्र ठेवलंय देहावर. रामलीला मैदान काल आलं त्यांच्या आयुष्यात. नाही तर कोणीही पीडित गा-हाणं घेऊन आला, की झालंच सुरू अण्णांचं उपोषण, बसल्या जागेवर. राळेगण सिद्धीतल्या यादवबाबा मंदिरात. ते तिथंच राहतात. जेवतात. झोपतात. अगदीच गरज पडली तर आळंदीतलं माऊलींचं मंदीर गाठतात. उपोषण सुरू. त्यातून कोणीही सुटलेलं नाही. आमदार, खासदार, मंत्री, सत्ताधारी, विरोधक.

खरं तर हेही अगदी परवा परवाचं आहे. अण्णा मिलिटरीतून गावी परतले ते डोक्यात कधीही पडणारा खटका घेऊनच. नवी दृष्टी मिळालेल्या अण्णांना दिसलं ते गावचं मागासलेपण. कर्मदारीद्र्य. हिरवाईचा मागमूस नसलेली कोरडवाहू जमीन. पिढ्यान् पिढ्याचं अडाणीपण, त्यातून आलेली गरीबी, हलाखी.. आणि गावभर झोकांड्या खात फिरणारे दारुडे. अण्णांनी ठरवलं, हे दुरुस्त करायचं...मग दारुड्या बाप्यांना बायकांनी वठणीवर आणलं. गावातली दारुची दुकानं बंद झाली. त्यानंतर सुरू झाले, पाणी अडवा पाणी जिरवा, कु-हाडबंदी, चराईबंदी, सामाजिक वनीकरण, बायोगॅस, नापास मुलांचं होस्टेल..असे एक ना अनेक ग्रामविकासाचे विविध प्रयोग. देशभरातले लोक राळेगणचा विकास पाहायला येऊ लागले.

राळेगणची पहिली लागण झाली ती शेजारपाजारच्या गावांना. त्यात पहिला नंबर माझ्या गावचा. गावडेवाडीचा. राळेगणप्रमाणं सुरुवातीला, दारुबंदी. मग साफसफाई, वृक्षलागवड, पाणी अडवा-जिरवा इत्यादी इत्यादी. मला आठवतं, पहिल्यांदा अण्णा गावात आलेले. मी असेन इयत्ता चौथीत. दत्तात्रय गायकवाड गुरुजींनी बसवलेलं
आसं घडलंच नव्हतं कधी
आसं पाहिलंच नव्हतं कधी
या गावामधी हो...
हे स्वागतगीत आम्ही रांगेत उभे राहून म्हटलो. अण्णांनी कौतुक केलं.

भाषणात अण्णा म्हणाले
''आपल्याला देश बदलायचाय. 
देश बदलायचा असेल तर राज्य बदलले पाहिजे.
राज्य बदलायचे असेल तर जिल्हा बदलला पाहिजे.
जिल्हा बदलायचा असेल तर तालुका बदलला पाहिजे.
तालुका बदलायचा असेल तर गाव बदलले पाहिजे.
गाव बदलायचं असेल तर माणूस बदलला पाहिजे.
आणि माणूस बदलण्यासाठी पहिल्यांदा स्वत:मध्ये बदल घडवून आणला पाहिजे..''
अण्णांचं हे भाषण आम्हाला पाठ झालं.

पुढं आमचं अवघं तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव आदर्श गाव, वनराई गाव, स्वच्छ गाव, उर्जा ग्राम, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव म्हणून गौरवलं गेलं. गावडेवाडी पहायला राष्ट्रपती, पंतप्रधान आले. देशविदेशातल्या मीडियात गावडेवाडी झळकली.. अण्णांचा आशीर्वाद! दुसरं काय?

पंचक्रोशीतलं कोणतंही समाजोपयोगी काम असो. सुरुवात अण्णांच्याच हस्ते. एनसीसीत असताना मावळातल्या उंच डोंगरांवर जाऊन पाणी अडवून जिरवण्यासाठी आम्ही तळी खोदली. अण्णा आले, पाहिलं, पाठीवर थाप टाकली. बस् काय पाहिजे आणखी!
दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णांनी डेरा टाकलाय. पाठीशी बापूजी आहेत. समोर जनसागर उसळलाय. अन् आमच्या अंगावर चोरटे रोमांच उभे राहतायत. अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!!

आदर्श गाव गावडेवाडीच्या विकासाची एक झलक दाखवणारा हा लेख. २० एप्रिल २००५ रोजी सकाळनं छापला होता.
                                                           (कृपया फोटोवर क्लिक करा)

No comments:

Post a Comment