'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 6 July 2011

संत संताबाई


वारकरी सांप्रदाय म्हणजे बंडाचा इतिहास. ज्ञान कडीकुलुपात बंद करणा-यांविरुद्ध संत ज्ञानदेवांनी पहिल्यांदा गोदावरी काठी बंडाचा झेंडा उभारला. तर इंद्रायणीकाठी भामनाथाच्या डोंगरावर देहुच्या तुकोबारायांनी बहुजनांसाठी बंडाची पताका फडकावली. त्यांचाच वारसा चालवणारं एक फारसं परिचित नसलेलं नाव म्हणजे पंढरपूरच्या संत संताबाई.

विठ्ठल दर्शनासाठी बंड 
विठ्ठल दर्शनासाठी चर्मकार समाजातल्या या संत संताबाईंनी विठ्ठलमंदिरात  बंड केलं होतं.
साडेतीनशे वर्षांपूर्वी संताबाईंचा जन्म पंढरपुरातल्या अणवली इथल्या घोडके कुटुंबात झाला. वडिल निस्सीम विठ्ठल भक्त असल्याने बालपणापासूनच संताबाईंना पांडुरंगाच्या भक्तीची आवड लागली. वडिलांसोबत संताबाई पंढरपूरला येत. पण दलित समाजाच्या असल्यानं त्यांना थेट दर्शन घेता येत नसे. त्यामुळं एक दिवस त्यांनी सवर्णांच्या रांगेत प्रवेश मिळवला आणि कोणालाही न जुमानता विठ्ठलाचं दर्शन घेतलं.
वाढत्या वयासोबत संताबाईची ही विठ्ठल वाढतच गेली. तिच्या पंढरपूरच्या वा-या वाढल्या विठ्ठलाच्या भजनातच त्यांचा जीव रमू लागला.

विठूरायाचं वेड लागलेल्या संताबाई अणवली ते पंढरपूर अशा वा-या करू लागल्या. लग्न झाल्यावरही त्यांच्या या वा-या थांबल्या नाहीत. उलट रात्री अपरात्रीही त्या सासरहून पायी पंढरीला जाऊ लागल्या.
मोहोळच्या संताराम देवळे या इसमासोबत संताबाईचं लग्न झालं. पण तिचं मन संसारात रमलं नाही.
विठूरायाच्या भक्तीनं वेड लावलेल्या संताबाईचं मन संसारात रमलं नाही. अगदी रात्री अपरात्रीही त्या मोहोळहून पंढरपूरला जाऊ लागल्या. त्यामुळं सासरच्या लोकांनी तिला घरातच डांबून ठेवायला सुरुवात केली.
पण सासरच्या विरोधाला न जुमानता संताबाई पंढरपूरला जातच राहिल्या. शेवटी सासरच्या लोकांना तिच्या भक्तीची सत्यता पटली. त्यांनी संताबाईला संसाराच्या बंधनातून मुक्त केलं. आणि संताबाई पंढरपुरातच येऊन स्थायिक झाल्या.
अनेक बहुजन संतांप्रमाणं संत संताबाईंही उपेक्षित राहिल्यात. खुद्द पंढारपुरातही त्या फारशा कोणाला माहीत नाहीत. पण सातासमुद्रापलिकडचे संशोधक संताबाईवर संशोधन करत आहेत. येत्या आषाढी एकादशीला तिचं चरित्रही प्रकाशित होणार आहे.

संताबाईंवर संशोधन
दुर्देवानं संताबाईचे अभंग उपलब्ध होत नाहीत. अमेरिकेच्या कार्लेमन कॉलेजमधील इतिहासाच्या प्रोफेसर संताबाईंवर संशोधन करतायत. तर लातूरच्या एका भाविकानं नुकतंच संताबाईचं चरित्र लिहिलंय.
या क्रांतीकारी संताबाईचा संपर्क बहुजनांचे कैवारी छत्रपती शाहू महाराजांशी होता. संताबाईच्या समाज कार्याची शाहूमहाराजांनी दखल घेतली होती. महाराजांनी तिला पंढरपुरात जमिन घेऊन दिली.
समाजातल्या उपेक्षित वर्गातल्या या महिला संतांचे विचार आता संशोधातून जनतेसमोर येत आहेत. यातून वारकरी पंथाच्या विचारांना एक नवी झळाळी प्राप्त होणार आहे.
संताबाईचे अभंग जरी अजून प्रकाशात आले नसले तरी तिच्या आठवणी भाविकांनी जपून ठेवल्यात. पंढरपुरात संताबाईचा मठ आहे. तर मोहोळमध्ये संताबाईची समाधीही आहे.

पंढरपुरात समाधी 
आपल्या माहेरात अर्थात पंढरपुरात संत संताबाईनं समाधी घेतली. या समाधीवर उभारलेल्या मठाचा सध्या जिर्णोधर सुरू आहे. समाधीपुढचं हे विठ्ठल रुखुमाईचं मंदिर शंभर वर्षांपूर्वी बांधल्याचं सांगितलं जातं. इथं संताबाईच्या काळातल्या खडावा आणि पाळणा आदी वस्तूही जतन करण्यात आल्यात. संताबाईंचे आकर्षक मुखवटेही मठात पाहायला मिळातात.

संताबाईच्या सासरमध्ये अर्थात मोहोळमध्येही तिच्या स्मृती पाहायला मिळतात. या जुन्या वाड्यात भिंतीवर लावण्यात आलेल्या या चित्राची भाविक आस्थेनं पूजा करतात. इथं संताबाईंची समाधीही उभारण्यात आलीय. संताबाईच्या या आठवणीच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतायत.
.............................................................................................

No comments:

Post a Comment