'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 6 July 2011

सासुरवाशीण सखूबाई


संत सखूबाईची कराडच्या मंदिरातील मूर्ती

सासुरवाशिणीचं दु:ख काय असतं याची कल्पना या महिला स्वातंत्र्याच्या काळातल्या सुनांना येणार नाही. पण सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या महिलांचं विश्व होतं, ते फक्त चूल आणि मूल. पण ही चौकट मोडण्याचं धाडस केलं ते कराडच्या एका सासुरवाशिणीनं, संत सखूबाईनं.

कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र आहे, एका सासुरवाशिणीचं, संत सखूबाईचं. सखूबाई होती एक सामान्य महिला. झाडलोट, दळण कांडण, धुणीभांडी करणारी, गाईगुरांमध्ये रमणारी. दृष्ट लागण्याजोगा संसार होता. आणि आणखी एक म्हणजे सखूबाईला असणारं देवधर्माचं वेड. पण तिची हीच देवभक्ती तिच्या खाष्ट सासूला पाहवेना. मग सुरू झाले सासूरवासाचे वेगवेगळे प्रकार. भल्या सकाळी उठल्यापासून ते रात्री उशीरा झोपेपर्यंत सासूचा हा जाच सखूबाईला अगदी नकोसा होई. अशा वेळी तिला आधार वाटे तो तिच्या देवाचा. कमरेवर हात ठेवून उभ्या राहिलेल्या विठुरायाचा.
संत सखूबाई न बोलता खाष्ट सासूचा जाच सहन करे. पण एकदा सखूबाई विठ्ठलाच्या ओढीनं व्याकूळ झाली.

नाद विठ्ठल विठ्ठल
सखूबाईचं हे गा-हाणं जणू देवानं ऐकलं. नदीवर पाणी भरायला गेलेल्या सखूबाईला टाळ मृदुंगाचा घोष ऐकू येऊ लागला. हा नाद जणू तिच्या आत्म्याला साद घालू लागला. आषाढी एकादशीसाठी नाचत गात निघालेली वारक-यांची दिंडी पाहून सखूबाई तल्लीन झाली. आणि सखूबाई पंढरीला निघाली. तोपर्यंत शेजारीण घागर घेऊन सखूच्या घरी पोहोचली. घडलेला प्रकार समजताच सासूचं माथं भडकलं. तिनं सखूबाईला घेऊन यायला तिच्या मुलाला फर्मावलं. नव-यानं दिंडी गाठली आणि मारझोड करतच सखूबाईला तो घरी घेऊन आला. नव-यानं आणि सासूनं मिळून सखूबाईला विना अन्नपाण्याचं एका खोलीत डांबून ठेवलं. देवाचा धावा करण्याशिवाय मग सखूबाईच्या हातात काहीच राहिलं नव्हतं.
सखूबाईच्या आर्त हाकेनं प्रत्यक्ष पांडुरंग व्याकूळ झाले. आणि त्यांनी सखूबाईसाठी स्त्रीवेष घेतला.

पांडुरंग झाले सखूबाई
स्त्रीरूप घेऊन पांडुरंग सखूबाईला जिथं बांधलं होतं, तिथं हजर झाले. तिचं दु:ख जाणून घेतलं. म्हणाले, तू पंढरीला जा. पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये. तोपर्यंत इथं तुझ्या जागी मी थांबतो.
सखू पंढरपुराला गेली. पांडुरंगाचं सावळं रुपडं पाहून धन्य धन्य झाली. आणि तिथंच तिने प्राण ठेवले.
दिंडीसोबत आलेल्या गावक-यांनी सखूबाईचे पंढरपुरातच अंत्यसंस्कार केले.
इथं करवीरमध्ये पांडुरंग सखूबाईचं सारी कामं करत होता. मात्र आता रुक्मिणीला चिंता वाटू लागली, आता पांडुरंगाला सखूबाईच्या घरीच अडकून राहावं लागेल म्हणून. मग रुक्मिणीमातेनं सखूबाईच्या अस्थी जमा करून तिला जिवंत केलं.
रुक्मीणी माता सखूला जिवंत करते. त्यानंतर सखू तिच्या सासरी परतते.

इकडं पंढरपूरला गेलेले गावकरी करवीरमध्ये परतात. आणि पंढरपूरचा प्रकार सांगायला सखूच्या घरी जातात. पण तिथं घरात काम करणारी सखूबाई पाहून त्यांना मोठंच आश्चर्य वाटतं.
गावक-यांच्या कहाणीवर सखूबाईच्या सासूचा विश्वास बसत नाही. ती त्यांना पिटाळून लावते. पण रस्त्यात त्यांना पंढरपूरहून जिवंत होऊन आलेली सखूबाई भेटते. तिला घेऊन ते पुन्हा सासूसमोर जातात. दोन्ही सखूबाई समोरासमोर येतात. सर्वांना तो भुताचा प्रकार वाटतो. आणि त्याचवेळी सखूच्या रुपातला देव प्रकट होतो. या प्रसंगानंतर सखूबाईचं नशीब पालटलं.

कराड नगरीत कृष्णा कोयनेच्या पवित्र संगमावर गावक-यांनी संत सखूबाईचं मंदिर उभारलंय. इथं सखूबाईंनं जिवंतपणीच घेतलेली समाधी पाहायला मिळते.
आजही पंढरपूरला निघालेले वारकरी आवर्जून सखूबाईच्या समाधीचं दर्शन घ्यायला येतात.
महिला स्वातंत्र्यांची पताका फडकावणा-या या आद्य माऊलीचा महिमा एकमेकाला सांगतात. आणि सखूबाईचे अभंग म्हणत पंढरपूरची वाट चालू लागतात.
.............................................................................................................

No comments:

Post a Comment