'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 6 July 2011

संत मायबाई


प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. अशीच एक महान माऊली विदर्भात होऊन गेली. जिच्या मार्गदर्शनामुळे श्री साईबाबा, गजानन महाराज, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज आदी थोर संत उदयाला आले. तिचं नाव जानकूबाई उर्फ मायबाई.

देशविदेशातील लाखो लोक ज्यांचे भक्त आहेत, त्या शिर्डीच्या साईबाबांना लोककल्याणाची प्रेरणा दिली ती एका निरक्षर महिलेनं. तिचं नाव जानकूबाई उर्फ संत मायबाई. विदर्भातील मोर्शी तालुक्यातील शिरखेडच्या देशपांडेच्या वारकरी घरात मायबाई जन्मल्या. त्यांचं माहेरचं नाव भागूबाई. अमरावतीतील चांदूर रेल्वे तालुक्यातील कु-हा गावच्या सीताराम देशपांडेंशी भागूबाईचं लग्न झालं. सासरच्यांनी तिचं नाव जानकू असं ठेवलं. लग्नानंतर जानकूचं वागणं खूप विक्षिप्त झालं. पण सीताराम यांनी ते मोठ्या मनानं सहन केलं.

संतांचा सहवास
सीतारामपंत पुढं वर्ध्यातील आर्वीत येऊन स्थायिक झाले. या ठिकाणी त्यांचा देहांत झाला. जानकू आणि त्यांचा मुलगा पांडुरंग पोरके झाले. या दरम्यान जानकूबाईंना संतांचा सहवास लाभला. त्यातूनच त्यांना आत्मभान आलं. दीनदुबळ्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली. मग रोज अगदी भिक्षा मागून त्यांनी गरीबांना अन्नदान सुरू केलं. त्यांच्या या कार्यामुळं तसंच विठ्ठलभक्तीमुळं त्यांना लोक संत मायबाई असं, संबोधू लागले. गोरगरीबांची सेवा करण्याचा हा मंत्र मायबाईंनी आपल्या अनुयायांनाही दिला. त्यातूनच मग श्री साईबाबा, गजाननमहाराज, ताजुद्दीनबाबा, अडकोजी महाराज, तुकडोजी महाराज आदी संत उदयाला आले.

विदर्भ म्हणजे उपेक्षेचा धनी. पण याच विदर्भातील अनेक संतांनी वारक-यांचा समतेचा विचार समाजात रुजवण्याचं मोठं कार्य केलं. याच संतांमधील एक महत्त्वाचं नाव म्हणजे, संत मायबाई. मायबाईंनी अनेक महापुरुषांच्या मनात ज्ञानज्योती पेटवल्या.

नाथपंथीय परंपरा
नाथपंथीय गुरू मच्छींद्रनाथाचा अनुग्रह गोरक्षनाथांना झाला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना उपदेश दिला. तर गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली. निवृत्तीनाथांनी आपल्या धाकट्या बंधूला ज्ञानदेवांना हा गुरुपदेश केला. याच परंपरेतले हैबतीबाबा. त्यांचा अनुग्रह मायबाईंना मिळाला.

1857च्या बंडाशीही संत मायाबाईं जोडलेल्या होत्या, असं सांगितलं जातं. उठावातील स्वातंत्र्यसैनिकांना त्यांनी आपल्या मठात आश्रय दिला होता. साईबाबा, ताजुद्दीनबाबा, गजाननमहाराज यांनाही आपल्या कार्याची प्रेरणा मायबाईंच्या मठातूनच मिळाली.

मायबाईंचा वारसा ख-या अर्थाने चालवला तो संत अडकोजी आणि संत तुकडोजी महाराजांनी. आर्वीच्या फिसके घराण्यातला वाया गेलेला आडकू नावाचा मुलगा मायबाईंच्या मार्गदर्शनामुळं पुढं संत अडकोजी महाराज म्हणून प्रसिद्ध पावला.
 अडकोजींची कृपा वरखेड यावलीच्या बंडुजी ब्रम्हभट्टाचा पुत्र माणिकवर झाली. हाच माणिक राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणून उदयाला आला.

मायबाईंच्या आठवणी
ग्रामगीता लिहून आणि आपल्या खंजिरी भजनांतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खेडोपाड्यांना जाग आणली. अडाणी निरक्षर जनतेला ज्ञानाची वाट दाखवली. त्यांचा हाच वसा आज त्यांचे शिष्य मोठ्या समर्थपणे चालवत आहेत. स्वत: आत्मविश्वासानं जगा आणि इतरांनाही जगायला बळ द्या, अशी शिकवण संत मायबाईंनी दिली. या माऊलीच्या आठवणी विदर्भातील जनतेनं जपून ठेवल्यात. आर्वी इथं त्यांच्या जुन्या मठाच्या जागेवर आता भव्य मंदिर उभारण्यात आलंय. यात मायबाईंची सुंदर मूर्ती बसवण्यात आली आहे. मायबाईंचा हा मठ म्हणजे एके काळी अनाथांचा आसरा बनला होता. आताही इथं भाविकांची वर्दळ सुरू असते.

मायबाईंनी सुरू केलेला गोकुळ अष्टमी उत्सव इथं उत्साहानं साजरा होतो. इथंच आडकोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मायबाईंचा अनुग्रह झाला. या संतांचा वारसा आता संत अच्युत महाराज चालवतात. त्यांच्या विचारांचा प्रसार करतात.

अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कार यांना भुलू नका. आपल्या कामातच राम शोधा. संसारातच विठ्ठल रखुमाई आणि गावातच पंढरपूर शोधा, असे मायबाईंचे विचार त्यांचे अनुयायी घरोघर पोहचवतात.
..............................................................................................................

No comments:

Post a Comment