'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 6 July 2011

गणिका कान्होपात्रा



विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार म्हणजे संत कान्होपात्रा. आजही ज्यांना समाजात मानाचं स्थान नाही, अशा एका गणिकेच्या पोटी कान्होपात्राने जन्म घेतला. आणि आपल्या विचारांनी वारकरी पंथात उच्च स्थान मिळवलं.

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा, जाऊ पाहे ॥...अशी देवाची आर्त विनवणी करणारी कान्होपात्रा म्हणजे मंगळवेढा गावची कान्होपात्रा गणिका. या युवतीवर जबरदस्ती केली जात होती, ती चक्क बादशाहाच्या सैनिकांकडून. आणि कुणीही मदतीला येत नसल्यानं ती विठुरायाचा धावा करत होती. मंगळवेढ्याच्या शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या पोटी जन्मलेली कान्होपात्रा ऐषोआरामी वातावरणात वाढली. आपला व्यवसाय कान्होपात्रेनं पुढं चालू ठेवावा, असं शामाला वाटत होतं. पण एकही पुरुष माझ्याशी लग्न करण्याच्या लायकीचा नाही, असं म्हणत तिने जणू बंडच पुकारलं. अशा वेळी कान्होपात्रेला आठवला तो पंढपुरात विटेवर उभा असलेला अनाथाचा नाथ. वारक-यांसोबत ती पंढरपुरात पोहोचली आणि विठुरायाच्या दर्शनानं देहभान हरपून गेली.

समाजव्यस्थेविरोधात बंड
कान्होपात्रेनं जे काही केलं ते खरं तर तत्कालीन समाजव्यवस्थेच्या विरोधातलं बंड होतं. कारण वेश्येला कशाला हवा नकार देण्याचा आणि स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार, असा खडा सवाल त्यावेळी केला गेला.
काळाला न रुचणारे असे धाडसी विचार कान्होपात्रेने आपल्या अभंगांतून व्यक्त केले. तिला हे धाडस आलं अनुभवातून. आईचा वेश्याव्यवसायच पुढं चालवला पाहिजे ही समाजाची सक्ती तिनं धुडकावली आणि स्वतंत्र वाट चोखाळली. अर्थात यासाठी तिला पाठबळ मिळालं होतं, ते वारकरी विचारांचं. मंगळवेढ्यातील संत चोखोबाचं. श्री विठ्ठलाच्या मंदिरात, वारक-यांच्या निकोप मेळ्यात कान्होपात्रेचा जीव रमून गेला. कान्होपात्रेचे सुस्वर आणि रसाळ अभंग ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करू लागले.

बादशाहाची वाईट नजर
कान्होपात्रेच्या सुस्वर गायनाची आणि लावण्याची चर्चा अगदी बिदरच्या बादशाहापर्यंत पोहोचली. आणि त्याला या कलावतीची अभिलाषा निर्माण झाली. शेवटी ज्या गोष्टीला नकार देऊन कान्होपात्रानं मंगळवेढा सोडलं होतं, तीच गोष्ट पुन्हा तिच्या समोर उभी राहिली. राजाच्या सैनिकांनी मंदिर वेढलं. आता आपल्यासाठी लाखो वारक-यांचं भक्तिस्थान असलेलं श्री विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त होईल, अशी भीती कान्होपात्रेला वाटली. सैनिकांकडं तिनं विठ्ठलाच्या दर्शनाची परवानगी मागितली. तिनं धावत जाऊन पांडुरंगाच्या पायाला मिठी घातली आणि आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला...
हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले । मजलागी झाले तैसे देवा ॥
मोकलून आस । जाहले उदास । घेई कान्होपात्रेस हृदयात ॥..कान्होपात्रेचा टाहो देवानं ऐकला आणि देवाच्या पायावरच कान्होपात्रेनं देह ठेवला. पुजा-यांनी मंदिराच्या आवारातच तिचं दफन केलं. तिथं आता एक तरटीचं झाड उगवलंय. त्याखाली कान्होपात्रेची छोटी मूर्ती उभी आहे.

गणिकेची पूजा
एखाद्या गणिकेची अर्थात वेश्येची पूजाअर्चा होताना तुम्ही कुठं पाहिलंय? होय, तिचं नाव संत कान्होपात्रा. प्रत्येक वारक-याच्या देव्हा-यावर तसंच कान्होपात्रेच्या मंगळवेढा या जन्मगावी आणि प्रत्यक्ष पंढरीतील पांडुरंगाच्या मंदिरात तिची नित्य पूजा होते. खेड्यातल्या महिला तल्लीन होऊन अतिशय भक्तिभावानं या गणिकेसाठी अर्थात वेश्येसाठी अभंग गातात. पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात एका कोप-यात संत कान्होपात्रेची समाधी आहे. तिच्या दर्शनासाठी आयाबाया गर्दी करतात. कान्होपात्रेची दुसरी मूर्ती आहे, मंगळवेढ्यात. पंढरपूरजवळचं हे मंगळवेढा गाव म्हणजे संतांची भूमी. संत दामाजी, संत चोखामेळा हे संत याच गावचे. गावच्या या लेकीचा लोकांना अभिमान आहे. गावात तिचं छोटसं देऊळ आहे. तिथं दर्शनासाठी भाविकांची वर्दळ असते.

No comments:

Post a Comment