'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Wednesday 6 July 2011

संत सोयराबाई

समतेचं तत्वज्ञान रुजवणा-या वारकरी पंथानं अनेक वास्तव चमत्कार घडवलेत. त्यातला एक अदभुत चमत्कार म्हणजे संत सोयराबाई. उपेक्षित आणि दारिद्र्यात जीवन जगणार्‍या या माऊलीनं लिहिलेले अभंग ऐकले किंवा वाचले तरी आपल्याला जीवन धन्य झाल्याचा अनुभव येतो.





अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग... किशोरी आमोणकरांनी गायलेला हा नितांतसुंदर अभंग ऐकून प्रत्यक्ष पांडुरंगही विरघळला असेल. पण हा अभंग कोणी लिहिलाय माहिती आहे? संत सोयराबाईंनी! होय, तीच ती निरक्षर, अठराविश्व दारिद्र्य झेलत, गावकुसाबाहेरचं उपेक्षित जीणं जगणारी चोख्याची महारी. सर्व संतांच्या अभंगाहून गोड आहेत, ते चोखोबांचे अभंग. आणि त्याहूनही गोड आहेत ते त्यांच्या पत्नीने, संत सोयराबाईनं लिहिलेले अभंग. अर्थात यामागे प्रेरणा आहे ती चोखोबांचीच.

संत चोखोबांचे कुटुंब मंगळवेढ्याचे. अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली सर्व उपेक्षा या कुटुंबानं काकणभर अधिकच सहन केली. अशा वेळी कुटुंबप्रमुखाला म्हणजेच चोखोबाला जगण्याचं बळ दिलं ते पंढरीच्या विठुरायानं.
आणि पत्नी सोयराबाईनं. तिनं चोखोबाच्या संसारात कष्ट तर उपसलेच पण चोखोबाच्या विठ्ठल भक्तीतही ती सोबत राहिली. त्याही पुढे जाऊन तिने चोखोबांप्रमाणेच अभंगरचनाही केली. त्यातून वारकरी पंथाची समतेची शिकवण ती आवर्जून सांगत राहिली.

सखा पांडुरंग
गावकुसाबाहेर राहणार्‍या चोखोबांच्या कुटुंबाला वारकरी संतांचा सहवास लाभला. साहजिकच पंढरीचा विठुराया त्यांचा सोबती झाला. त्यांची सुख दु:खं जाणून घेणारी प्रेमळ मायमाऊली बनला.
संत ज्ञानदेव, नामदेवांच्या संगतीत चोखामेळ्याला पांडुरंग भक्तीची गोडी लागली आणि या कुटुंबाचं जीवनच बदलून गेलं. सोयराबाईला वाटत होती मूलबाळ नसल्याची खंत. पांडुरंगानं त्यांच्या या भक्ताची इच्छा ओळखली. आणि ते याचकाच्या रुपानं त्यानं सोयराबाईच्या हातचा दहीभात खाऊन तिला आशीर्वाद दिला. देवाच्या आशीर्वादानं या दाम्पत्याला कर्ममेळा नावाचा मुलगा झाला.
वारकरी संतांचा चोखोबाच्या घरी राबता होता. एकदा चोखोबाच्या घरी स्नेहभोजनाला जमलेला संत मेळा पाहून देवालाही राहवलं नाही. तेही या पंगतीत सहभागी झाले. स्वत: बनवलेलं जेवण सोयराबाईंनी आग्रह करून वाढलं आणि जेवणारे सारे तृप्त होऊन गेले.


क्रांतीकारक अभंग
चोखा मेळ्याला संसारात साथ देणारी सोयराबाई ख-या अर्थानं लखलखली ती तिच्या रसाळ अभंगवाणीतून. साध्या, सोप्या रसाळ भाषेत तिनं जगण्याचं तत्त्वज्ञान मांडलं. अर्थात तिचं हे सारं तत्त्वज्ञान अनुभवातून आलं होतं.
देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ज्या काळात पराकोटीचा जातीभेद पाळला मानला जात होता, त्या काळात महार समाजातल्या या भाबड्या बाईनं अशा प्रकारचे क्रांतीकारक अभंग लिहिले.
‘‘आमुची केली हीन याती तुज का न कळे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता लाज न ये तुमच्या चित्ता’’
आम्हाला अस्पृश्य का केलेस, असा सवाल सोयराबाई अभंगातून देवाला विचारते. अभंगाच्या माध्यमातूनच समाजाशी झगडते, स्वत:शी वाद घालते.

सोयराबाईचे अवघे ६२ अभंग सध्या उपलब्ध आहेत. पण जे आहेत ते आपल्याला हलवून सोडणारे आहेत. डोळ्यात अंजन घालणारे आहेत. वेशीबाहेरच्या या माऊलीचं हे सारं शब्दवैभव अचाट करणारं आहे.  

निर्मळाचे अभंग
रसाळ अभंग लिहिणार्‍या संत चोखोबांना काळाच्याही पुढची दृष्टी होती. आपल्या कुटुंबालाही त्यांनी या ज्ञानभक्तीत सहभागी करून घेतलं. सोयराबाईसोबतच चोखोबाची बहीण निर्मळाही सुंदर अभंग लिहू लागली. सोयराबाईप्रमाणं निर्मळेचीही भाषा रोख ठोक आहे. तिनं तर थेट आपल्या गुरुला म्हणजेच संत चोखामेळ्यालाही खडसावलं. बाळंतपणाच्या काळात सोयराबाईला एकटं सोडून आल्याबद्दल ती अभंगातून चोखोबाची कानउघाडणी करताना दिसते.
विठुरायाही या नणंद भावजयींच्या अडीअडचणींना धावतो. सोयराबाईंच्या बाळंतपणासाठी श्री विठ्ठलच निर्मळेचं रुप घेऊन चोखोबाच्या घरी येतो. अशा या थोर संत कुटुंबांचे १३वे वंशज अजूनही पंढरपूरला राहतायत. चोखोबांचा वारकरी वारसा चालवतायत.

No comments:

Post a Comment