'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Tuesday, 23 August 2011

सावध ऐका पुढल्या हाका



मुंबईतल्या धावपळीतून आणि उकाड्यातून सुटका करून घेतली. बायकोपोरासह चार दिवसांसाठी गाव गाठलं. उन्हाळा तिथंही हजर होताच. नांगरलेल्या शेतातली ढेकळं आभाळाकडं तोंड करून पडलेली. तापलेल्या तव्यावर उमललेल्या लाह्यांसारखी. माणसं, गुरं, पखरं सावलीचा आडोसा पकडून चिडीचूप बसलेली. सकाळी उन्हं चढण्यापूर्वी आणि संध्याकाळी उन्हं उतरल्यावर जरा बरं वाटायचं.

एका सकाळी आई म्हणाली, चल रे, आपुन जरा धान्याला ऊन दावू. लै सोंडे झालेत. लिंबाच्या पाल्यालाही दाद देत नाहीत. धान्याला ऊन दाखवायला मदत करणं हा लहानपणीचा माझा आवडता कार्यक्रम. पोत्यातलं धान्य शेणाणं स्वच्छ सारवलेल्या ओट्यावर ओतायचं. हातानं पसरवायचं. तो रवाळ स्पर्श मला फार आवडायचा. धान्य दिवसभर खरपूस तापायचं. त्यातले सोंडकिडे कुठं तरी पळून जायचे. मग संध्याकाळी धान्य पोत्यात भरून, लिंबाच्या पाल्यानं पोत्याचं तोंड बंद करायचं. पोती पुन्हा घरात नेऊन थप्पीला लावायची.

Monday, 22 August 2011

आठवणी मृत्युंजयकाराच्या

मृत्युंजयकार शिवाजी सावंतांच्या काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत. आठवणी आहेत.  त्यांच्या लेखनिकानं सांगितलेल्या. 'मटा'नं 'अविष्कार' पुरवणीत त्या छापल्या.


                                                             (कृपया फोटोवर क्लिक करा)



फोटोग्राफी

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजात एक वर्षाचा रितसर डिप्लोमा करून मी फोटोग्राफर झालो होतो. त्याचा हा पुरावा.smile
                                     
                                     (कृपया फोटोवर क्लिक करा)

काही माणुसकी आहे की नाही?

मावळात गेल्या आठवड्यात आंदोलन करणा-या तीन माणसांना पोलिसांनी गोळ्या घातल्या. त्यावरून आठवलं. २००२मध्ये पुण्यातल्या मावळ भागात बिबळ्यांचा मोठा उपद्रव सुरू झाला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनानं उपाय काय केला तर, बिबळ्यांना गोळ्या घालणं! मानवी वस्तीच्याच आस-यानं राहणारे बिबळे म्हणाले असतील, 'अरे, या माणसांना काही माणुसकी आहे की नाही?' 
तर 'आज बिबळ्यांना घालतायत, उद्या इथल्या माणसांनाही गोळ्या घालतील', असं मी म्हणालो. दुर्दैवानं ते खरं झालं. बिबळ्यांच्या या शिरकाणावर मी एक लेख लिहिला आणि मुंबईला 'महाराष्ट्र टाइम्स'ला फोन केला. तिथं होते, आल्हाद गोडबोले. ते म्हणाले करा फॅक्स. केला. ८ सप्टेंबर २००२च्या रविवारच्या 'संवाद' पुरवणीत तो छापून आला.

                                                       (कृपया फोटोवर क्लिक करा)

काही वर्षांपूर्वी पुण्यातून महाराष्ट्र 'टाइम्स'ची 'अविष्कार' नावाची पुरवणी निघत असे. त्यात मी लिहित असे. बिबट्यांच्या प्रश्नावरचाच हा एक लेख. 

                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                           

Sunday, 21 August 2011

नातं गांधी टोपीचं

120 वर्षांच्या इतिहासात मुंबईतल्या डबेवाल्यांनी परवा पहिल्यांदाच काम बंद आंदोलन केलं. हे आंदोलन होतं, अण्णांना पाठींबा देण्यासाठी. अण्णा आणि डबेवाल्यांमध्ये एक नातं आहे. गळ्यातल्या तुळशीमाळेचं, गांधी टोपीचं आणि अविरत जनसेवेचं.
यानिमित्तानं आठवलं, पुण्या-मुंबईचं, डबेवाल्यांचं हातातोंडाचं नातं. सुचलेला विषय 'लोकमत'च्या पुरवणीचे संपादक प्रदीप निफाडकरांना सांगितला. त्यांनी तो समूहसंपादक अरुण टिकेकरांना सांगितला. टिकेकर मुंबई-पुण्याच्या इतिहासात रमणारे. चटकन् हो म्हणाले. आणि 'लोकमत'च्या १६ नोव्हेंबर २००३ च्या 'मंथन' या रविवार पुरवणीच्या पहिल्या पानावर 'मुंबईकरांसाठी पुणेकर डबेवाले' नावाचा माझा दणका लेख छापून आला.


                        (कृपया फोटोवर क्लिक करा)

पुणेकर काय खातात?

''पुणेकर काय खातात? किंवा काय खात असत?'' याविषयी जगाला उत्सुकता असणारच! याच विषयावर पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमात (शॉर्टकट- रानडे इन्स्टिट्यूट) सन १९९८मध्ये सालाबादप्रमाणे लेखनस्पर्धा झाली. त्याचे कै. चिं. वि. तथा अप्पासाहेब जोग पारितोषिक आम्हांस मिळाले. 'लोकमत'च्या 'सखी' पुरवणीत ते गुरुवार दि. २५ मार्च २००४ रोजी छापले गेले. त्याची ही ओरिजनल कॉपी...

                                                            (कृपया फोटोवर क्लिक करा)


                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

                                                          (कृपया फोटोवर क्लिक करा)

अब बुढ्ढा नही हटेगा



काँग्रेसचे प्रवक्ते खिल्ली उडवत होते, तेव्हा अण्णा राजघाटावर गांधींजींच्या समाधीसमोर ध्यान लावून बसले होते. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ. निश्चल. निग्रही.
म्हटलं, अब बुढ्ढा हटेगा नही भाई...

मित्र म्हणाले, ‘‘म्हातारा भारीचै राव. प्राणायाम शिकवणा-या रामदेवबाबांची पाच दिवसांत हालत पतली झाली. ह्यानं तर सरकारचीच कढी पातळ केली. कुठल्या गिरणीचं पीठ खात असेल कोणास ठाऊक?’’
म्हटलं, महाराज, हा वारकरी आहे, आळंदी पंढरीचा. निर्जळी एकादशी करणारा. माऊलींची वारी करणारा. उपवासाचं काय घेऊन बसलात? या माळक-यानं केव्हाच तुळशीपत्र ठेवलंय देहावर. रामलीला मैदान काल आलं त्यांच्या आयुष्यात. नाही तर कोणीही पीडित गा-हाणं घेऊन आला, की झालंच सुरू अण्णांचं उपोषण, बसल्या जागेवर. राळेगण सिद्धीतल्या यादवबाबा मंदिरात. ते तिथंच राहतात. जेवतात. झोपतात. अगदीच गरज पडली तर आळंदीतलं माऊलींचं मंदीर गाठतात. उपोषण सुरू. त्यातून कोणीही सुटलेलं नाही. आमदार, खासदार, मंत्री, सत्ताधारी, विरोधक.

खरं तर हेही अगदी परवा परवाचं आहे. अण्णा मिलिटरीतून गावी परतले ते डोक्यात कधीही पडणारा खटका घेऊनच. नवी दृष्टी मिळालेल्या अण्णांना दिसलं ते गावचं मागासलेपण. कर्मदारीद्र्य. हिरवाईचा मागमूस नसलेली कोरडवाहू जमीन. पिढ्यान् पिढ्याचं अडाणीपण, त्यातून आलेली गरीबी, हलाखी.. आणि गावभर झोकांड्या खात फिरणारे दारुडे. अण्णांनी ठरवलं, हे दुरुस्त करायचं...मग दारुड्या बाप्यांना बायकांनी वठणीवर आणलं. गावातली दारुची दुकानं बंद झाली. त्यानंतर सुरू झाले, पाणी अडवा पाणी जिरवा, कु-हाडबंदी, चराईबंदी, सामाजिक वनीकरण, बायोगॅस, नापास मुलांचं होस्टेल..असे एक ना अनेक ग्रामविकासाचे विविध प्रयोग. देशभरातले लोक राळेगणचा विकास पाहायला येऊ लागले.

राळेगणची पहिली लागण झाली ती शेजारपाजारच्या गावांना. त्यात पहिला नंबर माझ्या गावचा. गावडेवाडीचा. राळेगणप्रमाणं सुरुवातीला, दारुबंदी. मग साफसफाई, वृक्षलागवड, पाणी अडवा-जिरवा इत्यादी इत्यादी. मला आठवतं, पहिल्यांदा अण्णा गावात आलेले. मी असेन इयत्ता चौथीत. दत्तात्रय गायकवाड गुरुजींनी बसवलेलं
आसं घडलंच नव्हतं कधी
आसं पाहिलंच नव्हतं कधी
या गावामधी हो...
हे स्वागतगीत आम्ही रांगेत उभे राहून म्हटलो. अण्णांनी कौतुक केलं.

भाषणात अण्णा म्हणाले
''आपल्याला देश बदलायचाय. 
देश बदलायचा असेल तर राज्य बदलले पाहिजे.
राज्य बदलायचे असेल तर जिल्हा बदलला पाहिजे.
जिल्हा बदलायचा असेल तर तालुका बदलला पाहिजे.
तालुका बदलायचा असेल तर गाव बदलले पाहिजे.
गाव बदलायचं असेल तर माणूस बदलला पाहिजे.
आणि माणूस बदलण्यासाठी पहिल्यांदा स्वत:मध्ये बदल घडवून आणला पाहिजे..''
अण्णांचं हे भाषण आम्हाला पाठ झालं.

पुढं आमचं अवघं तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव आदर्श गाव, वनराई गाव, स्वच्छ गाव, उर्जा ग्राम, निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव म्हणून गौरवलं गेलं. गावडेवाडी पहायला राष्ट्रपती, पंतप्रधान आले. देशविदेशातल्या मीडियात गावडेवाडी झळकली.. अण्णांचा आशीर्वाद! दुसरं काय?

पंचक्रोशीतलं कोणतंही समाजोपयोगी काम असो. सुरुवात अण्णांच्याच हस्ते. एनसीसीत असताना मावळातल्या उंच डोंगरांवर जाऊन पाणी अडवून जिरवण्यासाठी आम्ही तळी खोदली. अण्णा आले, पाहिलं, पाठीवर थाप टाकली. बस् काय पाहिजे आणखी!
दिल्लीच्या रामलीला मैदानावर अण्णांनी डेरा टाकलाय. पाठीशी बापूजी आहेत. समोर जनसागर उसळलाय. अन् आमच्या अंगावर चोरटे रोमांच उभे राहतायत. अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!!

आदर्श गाव गावडेवाडीच्या विकासाची एक झलक दाखवणारा हा लेख. २० एप्रिल २००५ रोजी सकाळनं छापला होता.
                                                           (कृपया फोटोवर क्लिक करा)