'विठ्ठल'

तुका म्हणे चवी आले।
जे का मिश्रित विठ्ठले।।
''भाजीत चमचाभर मीठ किंवा चहात दोन चमचे साखर टाकली म्हणजे जशी त्यांना रुची येते, तसा प्रत्येक कामात थोडा तरी 'विठ्ठल' मिसळीत जावे, म्हणजे त्याला गोडी येते''
-आचार्य अत्रे

Friday 1 July 2011

ग्यानबा तुकाराम


खापर खापर पणजोबा हेच करायचे.
आजोबांनी ते जपलं, वाढवलं.
वडील त्यांच्या वाटेवरून चालत आहेत.
आम्ही चाकोरी बदलली.
पण शेवटी सगळ्या वाटा तिथंच तर जाऊन मिळतात.
हे आषाढाचं आभाळ असं दाटून आलं ना की, शेकडो चुंबक लावल्याप्रमाणं जीवाला ओढणी लागते. कुठल्या तरी माध्यमातून तो जोडून घेतोच.
सावळा विठुराया आणि पंढरीची वाट...
ही वाट उजळवणा-या आमच्या मायमाऊल्या कुठं तरी लुप्त झाल्यात.
मंगळवेढ्याच्या वेशीखाली, विठ्ठल मंदिरातल्या तरटीच्या मुळांखाली, पंढरीबाहेरच्या पडक्या मठात, पोपडे उडालेल्या भिंतीत, कृष्णेच्या काठी, विदर्भ, मराठवाड्यातल्या मातीत...आम्ही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत.
मी मराठी बातम्यांमध्ये रोज एका महिला संतावर स्पेशल प्रोग्रॅम दाखवत आहोत. आवर्जून पाहा, वाचा – ‘माझे पंढरीचे आई’...
संत मुक्ताबाई


संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव...एकाने भेदभाव दूर सारणा-या वारकरी पंथाचा पाया घातला तर दुस-याने या पंथाचा झेंडा देशभर फडकावला. या दोघांच्याही हातून हे थोर कार्य घडून आलं ते एका छोट्या चुणचुणीत मुलीमुळं. होय, तिचं नाव मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानदेव आणि सोपानदेवांची धाकटी बहिण मुक्ताबाई. आपल्यापासून वयानं मोठ्या असणा-या या दोघा संतांना मुक्ताईनं वेळीच कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि या संतांनी मानवतेचा इतिहास घडवला.

अनुभव झाला गुरू
इंद्रायणीकाठी देवाच्या आळंदीत १२७९ मध्ये मुक्ताबाईचा जन्म झाला. खेळण्याबागडण्याच्या वयात इतर भावंडांप्रमाणंच छोट्या मुक्ताच्या वाट्यालाही उपेक्षा, वनवास आला. कारण लग्नानंतर संन्यास घेऊन पुन्हा संसारात रमल्यामुळे त्यांच्या मात्यापित्यांना वाळीत टाकण्यात आलं होतं. या दोघांनी नंतर इंद्रायणीत देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि या भावंडांचं छत्र हरपलं. या भावंडांवरही बहिष्कार टाकण्यात आला. पण या अनुभवातून ही भावंडं तावूनसुलाखून निघाली.

भातुकली खेळण्याच्या वयातच मुक्ताईवर जबाबदारी पडली. वाळीत टाकलेलं जीवन, समाजाकडून अवहेलना, आप्तांचं झिडकारणं, शेजा-या पाजा-यांकडून अपमान यांनी मुक्ताबाईचं बालपण करपून गेलं. याच कटू अनुभवांचा परिणाम मुक्ताबाईच्या स्वभावावर झाला. वागण्यात आणि काव्यातही एक फटकळपणा उतरला.

तर ज्ञानदेव झाले नसते
सर्वात धाकटी असूनही मुक्ताबाईनं आपल्या मोठ्या भावंडांना आईच्या प्रेमानं सावरलं. आणि प्रसंगी कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी वडिलांसारखी कठोरही झाली. त्यामुळंच मुक्ताबाईनं वेळीच फटकारलं नसतं तर ज्ञानदेव घडलेच नसते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.संत मांदियाळीत मुक्ताईचं नाव मानानं घेतलं जातं. निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान हे साक्षात ब्रम्हा, विष्णू आणि महेश तर इटुकली मुक्ताई म्हणजे आदिमायेचा अवतार, असं संत नामदेवांनी म्हटलंय. आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेऊनही या भावंडांची उपेक्षा, वनवास संपला नाही.

निवृत्तीनाथांना एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यासाठी मुक्ताई खापराचं भांडं आणायला कुंभाराकडे गेली. पण विसोबा खेचर नावाच्या निष्ठूर माणसानं हे भांडं काही तिला मिळू दिलं नाही. अशा वारंवार होणा-या अवहेलनेला ज्ञानदेवही कंटाळले. विश्वशांतीचं पसायदान मागणारे ज्ञानदेव मग अपमानाने चिडले, संतापले. दार बंद करून घरात बसले. जेवायलाही येईनात. सा-या जगावरच ते रुसले होते. मग मुक्ताईनं वडिलकीची भूमिका घेतली. ज्ञानदेवाची समजूत घालण्यासाठी दाराशी बसून तिनं जे अभंग आळवले ते अमर झाले.

या अभंगांमुळेच ज्ञानदेव पुन्हा भानावर आले. अज्ञानाची कवाडं उघडण्याचं आवाहन मुक्ताईनं या ताटीच्या अभंगांतून केलं. राग, अहंकार, असूया सोडून इतरांवर प्रेम करण्याचा संदेश तिनं या अभंगांतून दिला. मुक्ताईच्या या अभंगांमधूनच संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पुढं प्रेमाचा वर्षाव करणारी विश्वाची माऊली झाले.

तुम्ही तरुनी विश्वतारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा l
या अभंगांतून मुक्ताबाईच्या व्यक्तिमत्वातील समंजसपणा, सामाजिक भान, सर्वसामान्यांच्या कल्याणाची भावना व्यक्त झाली आहे. आणि हे भान ते आपल्या ज्ञानवंत भावाला अर्थात ज्ञानदेवालाही मिळवून देतात. त्यामुळंच ज्ञानदेवासह सर्वच भावंडांनी धाकट्या मुक्ताईला वडिलकीचा मान दिला.

संत मांदियाळीवर अधिकार
मुक्ताबाईचा हा वडिलकीचा अधिकार केवळ ज्ञानदेवादी भावंडांवरच नव्हे, तर संपूर्ण संत मांदियाळीवर चालत होता. ज्ञानाच्या अहंकारात जो जो बुडाला त्याला बौद्धीक फटके देत भानावर आणण्याचं काम मुक्ताईनं केलं.
वारकरी पंथांची पताका देशभर नेणा-या संत नामदेवांनीही त्याचा अनुभव घेतला.
संत नामदेवराय हे विठुरायाचे लाडके. देवासोबत थेट गप्पा गोष्टी करणा-या, त्याच्यासोबत जेवणा-या नामदेवाचं इतर संतांना केवढं तरी अप्रूप होतं. साहजिकच नामदेवांमध्ये एक सुप्त अहंकार निर्माण झाला होता. ज्ञानदेवादी भावंडांची नामदेवांशी पहिल्यांदा भेट झाली. या भावंडांनी केलेल्या नमस्काराला नामदेवांनी बरोबरीचा प्रति नमस्कार केला नाही. नामदेवांना गर्वाची बाधा झाल्याचं चाणाक्ष मुक्ताबाईच्या लक्षात आलं. आणि तिनं तिथल्या तिथं झणझणीत शब्दात नामदेवाची कानउघाडणी केली.

दुसरा प्रसंग नामदेवाच्या परीक्षेचा. पंढरीला जमलेल्या संतमेळ्यात सर्वांच्या संतपणाची परीक्षा करण्याची आयडिया मुक्ताईचीच. ती वयोवृद्ध गोरोबाकाकांना त्यांच्या थापटीनं प्रत्येकाची मडकी अर्थात डोकी थापटून चेक करायला सांगते. सर्व संत या थापट्या सहन करतात. पण नामदेव चिडतात. त्यावरून हे मडकं अजून कच्चंच आहे, असं सांगत मुक्ताई नामदेवाला भानावर आणतात. आत्मपरीक्षण करायला लावतात...
अखंड जयाला देवाचा शेजारl कारे अहंकार नाही गेलाll
मान अपमान वाढविसी हेवाl म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शनाl
आधी अभिमाना दूर करा ll

अहंकार गळून पडलेल्या नामदेवांनी पुढं देशभर भ्रमण करत वारकरी पंथ सर्वदूर पोहोचवला. म्हणूनच आपल्या अभंगातून संत नामदेव मुक्ताईचं ऋण व्यक्त करत राहतात.

लहान वयात मोठा अभ्यास
अगदी लहान वयात मुक्ताबाईनं मोठा अभ्यास केला होता. या अभ्यासाला चिंतन, अनुभव आणि सामाजिक भानाची जोड मिळाली होती. त्यातूनच केवळ योगाभ्यास हेच जीवन मानणा-या योगी चांगदेवांना तिनं वास्तवात आणलं.

आपलं योग-सामर्थ्य दाखवण्यासाठी वर्षानुवर्षे तप करणा-या योगीराज चांगदेवांना संत ज्ञानेश्वरांना भेटण्याची इच्छा झाली. पण ज्ञानदेव वयानं खूप लहान असल्यानं मायना न लिहिता त्यानं ज्ञानदेवांना कोरंच पत्र लिहिलं. ते पाहून वर्षे तप करून मुक्ताईनं मोठी मार्मिक टिपण्णी केली. मग चांगदेव जिवंत वाघावर बसून ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले तर ही भावंडं निर्जीव भिंतीवर बसून चांगदेवाल सामोरी गेली. त्यांच्यामध्ये सखोल चर्चा झाली. त्यातून मुक्ताईच्या ज्ञानाची अनुभूती चांगदेवांना आली. आणि त्यांनी लहानग्या मुक्ताईला चक्क गुरूमाऊली मानलं.

चांगदेवाला बाळ मानून रचलेली मुक्ताईची पाळणागीतं प्रसिद्ध आहेत. संत परंपरेत मुक्ताईची मानाचं पान नेहमी प्रथम मांडलं जातं. याचं कारण म्हणजे मुक्ताईची प्रखर बुद्धीमत्ता, अभ्यास, व्यासंग आणि ज्ञान इतरांनाही देण्याचं समाजभान. आपल्या कर्तृत्वानं मुक्ताईनं वारकरी पंथाला मोठीच झळाली प्राप्त करून दिलीय.

मुक्ताईचा मान मोठा
वारकरी पंथात मुक्ताईला मोठा मान आहे. अजूनही गावोगाव, घरोघर मुक्ताईचे अभंग म्हटले जातात. जळगावमध्ये मुक्ताईचं मोठं मंदिर आहे. तिथून दरवर्षी मुक्ताईची दिंडी पंढरपूरला जाते. तर पंढरपूरमधल्या मुक्ताईमठात दर्शनासाठी हजारो वारकरी गर्दी करतात.

.............................................................................................


याच काळात महिला संतांवर मी लिहिलेला लेख 'लोकसत्ता'ने छापला. ही त्याची लिंक - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=170432:2011-07-14-14-47-35&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194


पीडीएफ - http://epaper.loksatta.com/8031/indian-express/16-07-2011#p=page:n=33:z=2


2 comments:

  1. खूपच छान लिहिले आहेस.

    ReplyDelete
  2. धन्यवाद. Actuly ते tv programme Script आहे सुहासजी. कट पेस्ट केलेय जसेच्या तसे :)

    ReplyDelete